Thursday, April 9, 2020

मला मेलीला काय लागतं

'मला मेलीला काय लागतंय?" 80 वर्षात पदार्पण केलेल्या त्या माऊलीचे हे नेहेमीचे शब्द.  अन्न,कपडा,दागिने, पैसा, चैन,कुठलाच मोह उरला नव्हता. 3 खोल्यांच्या आटोपशीर छोट्या सदनिकेत ही माऊली आयुष्याची तिन्हीसांज व्यतीत करत होती.
गरजा अत्यन्त मूलभूत,गाडी असून सुद्धा बाहेर हिंडण्याची अजिबात इच्छा नसलेली,वाचनाचा व्यासंग नसलेली. जोडीदार  50 वर्ष सर्वपरीने साथ देऊन थोडक्यासाठी हात सोडून कैलासवासी झाला. त्याच्या आठवणीत, रोज स्वतःचे रुक्ष मन त्यांच्या सहजीवनाच्या ओल्या आठवणीत भिजऊन ती माऊली दिवस काढायची. मुले,नातवंड असलेले  समृद्ध कुटुंब. पण सर्व जण आपापल्या सौंसारात व्यस्त. तरी  हाकेच्या अंतरावर राहणारी कन्या सर्वार्थाने अतिशय समाधानकारक पद्धतीने सांभाळत होती. म्हंटले तर या माउलीला कुठलीच विवंचना नव्हती. गरजा अत्यन्त अल्प, आर्थिक दृष्ट्या सधन, कोणापुढे हात पसरण्याची गरज नव्हती. तरी तिच्या डोळ्यात पाहिले,की खोल कुठेतरी औदासिन्य,दुःख, एकटेपण,जाणवायचा.
 कोरोना इन्फेकशन मुळे बंदीवास चालू झाला. 10 दिवस  काढले होते. अजून किती दिवस नक्की कोणालाच सांगणे अशक्य. लोकडाऊन असल्यामुळे, कुठे जाणे येणे नाही, मित्रांसोबत फक्त फोनवर समभाषण. नित्याचे घर  काम करायला मदत करून, अंघोळ उरकून रविवारी विचार करत बसलो होतो.  माझ्या आईच्या आयुष्याचा विचार करू लागलो. काही औंशी, वार्धक्याचा ट्रेलर जगण्याचे औचित्य साधत होतो.
मग, वार्धक्याचा विचार करत असताना जाणवले,की दैनंदिन गरजांच्या पेक्षा जास्त महत्वाचे असते,ते व्यवधान. मनाला टवटवीत ठेवणे,नैराश्य,औदासिन्य,नकारकता या व्याधींपासून जपणे,हे अत्यावश्यक. माझे वडील,हे  सकारत्मकता ,सदैव ओसंडून वाहणारा उत्साह,चैतन्य,याचे प्रतीक होते. त्यांचे समरण करता ओठांवर स्मितहास्य आले,पण डोळ्याच्या कडा ओलावल्या. ते कधीच स्वस्थ बसले नाहीत,पण स्वतःला व्यस्त ठेवत. वाचन, व्यायाम,सत्संग,असे नानाविध गोष्टींच्या आधारे स्वतःला रमवायचे. वार्धक्य हे मानण्यावर असते,याची प्रचिती दिली त्यांनी.
शारीरिक गरजा भागवण्या इतपत सुस्थिती असतेच बर्याच लोकांची. अगदी चैन नसली,तरी अन्न वस्त्र,निवारा,करमणूक,आशा मूलभूत गरजा पुरवण्या इतपत सुस्थिती असते.
पण मानसिक, भावनिक,गरजा भागवणे, आनंदी राहणे,ही  खरी  कसब.
आयुश्यात काय चुकले,काय करायला हवे होते,कोणाशी कसे वागायला हवे होते, हे विचार उगीच मनाला त्रासदायक ठरतात. भूतकाळात वावरून हाती फारसे काही लागत नाही. भविष्य काळात काही फार उजवल आणि वेगळे असण्याची चिन्ह नाहीत.  वर्तमान काळात मनाला टाके घालून शिवून टाकणे, हे महत्वाचे.
दीर्घायुषी असावे असे सगळ्यांनाच वाटते. मग डोळ्यापुढे सगळे दिवेकर,दीक्षित,इतर डाएट प्रकार, न चुकता व्यायाम,पथ्य, औषध पाणी, असले अनेक प्रयत्न डोळ्यापुढे आले. हे सर्व करून,दीर्घायुषी झालो,तरी जगून नेमके काय करायचे,याचा सुद्धा विचार करणे खूपच महत्वाचे. निरुपद्रवी,स्वावलंबी,हसत खेळत आयुष्य असणे,व मिळालेला वेळ सत्कारणी लावणे,हे अत्यन्त गरजेचे.
ह्या मिळालेल्या संधीचा वापर करून,ह्या विषयी सर्वांनी थोडे चिंतन करावे.
मला मेल्याला काय लागते,याचे उत्तर भौतिक नसून,अभिप्रेत असते ते आधिभौतिक. मिळालेला वेळ,व संधी कोहम,याचे उत्तर शोधणे,आणि या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम असण्याची जाणीव करून देणारे आयुष्य असावे. आई,तू आनंदी राहा,काळजी करत, जुन्या कटू,आठवणी उगाळत न बसता, स्वतःशीच मैत्री करून हसत खेळत रहा,आणि आमच्या आयुष्याची तिन्हीसांज सुद्धा आनंदात जावी,हीच प्रभू चरणी प्रार्थना.

डॉ दीपक रानडे.

No comments: