Sunday, November 7, 2021

आयुष्याची रुबिक क्युब

 आयुष्याची रुबिक क्युब


1980 साली रुबिक क्युब नावाचा एक विलक्षण आविष्कार एक हंगेरियन शिल्पकार आणि वास्तुविशारद असलेल्या Erno Rubik याने डिझाइन केला. या क्यूबनी जगात खळबळ उडवून दिली.  सर्वात जास्त खपणारा खेळ म्हणून प्रसिद्ध झाली ही क्युब. ही क्युब म्हणजे खूपच युनिक होती. 6 बाजू असलेल्या ह्या क्युबच्या प्रत्येक बाजू मध्ये 9  वेगवेगळ्या रंगाचे चौकोन होते. ती क्युब म्हणजे एक प्रकारचे कोडे होते. त्या क्युबची वरची,खालची आणि दोन्ही बाजूच्या रांगा फिरवणे शक्य होते. त्या फिरवल्यावर सर्व 6 रंगांचे छोटे चौकोन विखरून जात. कोडे सोडवण्यासाठी सर्व एकच रंगाचे 9 चौकोन एकत्र आणून 6 बाजूचे 6 रंग पूर्ण करायचे. 

सर्व तरुण,वयस्कर,गृहिणी,विद्यार्थी ह्या क्युबच्या मागे वेडे झाले होते. अगणित combinations होऊ शकत होती त्या क्युबची. 

मी कॉलेज मध्ये होतो आणि कर्म धर्म संयोगाने,मी ती क्युब 8 ते 10 मिनिटात पूर्ण करत होतो. वर्गातले सगळे खूपच आश्चर्यचकित होत असे. ती क्युब पूर्ण करण्याचे एक टेकनीक होते. एकेक रांग स्टेप बाय स्टेप पूर्ण करत हळू हळू ती क्युब पूर्ण करावी लागे. पुढे पुढे ,त्या क्यूबला पूर्ण करताना त्रेधातिरपीट उडायची. एक बाजू पूर्ण केली की इतर बाजू विस्कटून जायच्या. अखेर मार्ग सापडायचा पण खूप प्रयत्न करावे लागले. 

वय होत गेले,तशी ती क्युब विसरून गेलो. पर्वा,एका मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्याच्या 12 वर्षाच्या पुतण्याच्या हातात ती क्युब दिसली. 

का कोणास ठाऊक,पण ती क्युब त्याच्या कडून मागितली आणि 10 मिनिटात पूर्ण करून दाखवतो,आशा फुशारक्या मारत कामाला लागलो. पाऊण तास गेला,पण ती क्युब पुर्ण तर सोडा,एक बाजू देखील पूर्ण करू शकलो नाही. नाद सोडून दिला आणि अहंकाराचे झालेले तुकडे एकत्र करीत ती क्युब परत केली.

आणि मग एक विचार सहजच मनात आला.

आयुष्याची देखील रुबिक क्युब असते. 6 रंग म्हणजे आयुष्यातील  6 पैलू. तब्येत,पैसा, प्रसिद्धी,कुटुंब,व्यवसाय आणि अध्यात्म. ह्या 6 पैलूंचे चौकोन एकमेकात मिसळून, ती क्युब पुर्ण विस्कळीत होती. कुटुंबाची बाजू पूर्ण करायला गेलं,की इतर बाजू अपुऱ्या. मग एक रांग तरी पूर्ण करायचा प्रयत्न. ती रांग पूर्ण होताच बरोबर मागे असलेली अध्यात्माच्या बाजूची रांग बिघडली. अवघड होतं. एक रांग देखील एकाच रंगाची पूर्ण करू शकलो नाही. 

इतरत्र नजर फिरवली,तर काही मंडळींची एखाद बाजू पूर्ण दिसायची. काहींची कुठली बाजू पूर्ण असली,तरी कुठलीच बाजू इतर बाजूंपेक्षा श्रेष्ठ नसते. आयुष्याची क्युब दुसरीकडून पहिली,तर बाकीच्या बाजूंची बोंबच दिसायची. सगळ्यांची सगळ्या बाजू पूर्ण करायची धडपड. पण कुठली तरी बाजू अपूर्णच. मग जाणवले,की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या बाजू काही काळा करता पूर्ण दिसत. काही काळ गेल्यावर दुसरी बाजू,पूर्ण करण्याच्या नादात पूर्ण झालेली बाजू पुन्हा विस्कळित. एकाच वेळी सगळ्या बाजू पूर्ण होणे नाहीच. 

मग विचार आला, सगळ्या बाजू काही औंशी पूर्ण करायचा प्रयत्न करत राहणे,एवढेच आपल्या हातात. बऱ्यापैकी पूर्ण असलेली बाजू तेवढ्यापुरतं चांगली दिसते. पण दुसऱ्या बाजू बघण्याचा प्रयत्न केला,की त्यांची अपूर्णता जाणवायची. 

कुटुंबाच्या बाजूत थोडे पैशाचे चौकोन घुसून ती बाजू विस्कळित. तब्येतीच्या बाजूत प्रसिद्धीचे चौकोन घुसून ती बाजू बिघडवायची.सगळीच गुंतागुंत. कुठलीच बाजू धड किंवा पूर्ण नाहीच.कोणाचीच क्युब पूर्ण नसतेच. त्यातल्या त्यात पूर्ण असलेली बाजू प्रथमदर्शनी ठेवून, सगळी क्युब पूर्ण असल्याचा फोल देखावा करणे. खेळातली क्युब सोडवली होती खरी. पण आयुष्याच्या क्युबची एखाद बाजू तरी पूर्ण होईल का, ही शंका मनात घुटमळत होती. मग दुरून ती क्युब पहिली,आणि त्या अपूर्ण पण रंगीबेरंगी क्युब सुद्धा देखणी वाटू लागली. कदाचित,कुठलीच बाजू पूर्ण करण्याचे वांझोटे प्रयत्न सोडून द्यावे. आपल्या आयुष्याची क्युब आहे तशीच अपूर्ण पण वैविध्यपूर्ण आहे. एखादी रांग जमेल तशी पूर्ण करावी. नाही जमल्यास, विस्कटलेल्या रांगेतील वैविध्यतेचा स्वाद घ्यावा.  पूर्ण असलेली क्यूबच श्रेष्ठ, हा अतिरेकी हट्ट सोडून दिला,तरच विविधरंगी क्यूबचे सौंदर्य जाणवेल. आयुष्यतला कुठलाच पैलू परफेक्ट नसतो. Happiness lies more in savoring the delectable imperfections rather than seeking it in an obsessive quest for perfection. ती अर्धवट रंगीबेरंगी क्युब त्या मुलाला परत देताना पराभव पत्करलयाची रुखरुख होती,पण जाणिवेची क्युब पूर्ण झाल्याचा आनंद सुद्धा होता. 


Dr. Deepak Ranade.

किंमत

 किंमत.

    त्याला वेदना असाह्य होत होत्या. हात डोक्यावर ठेवावा लागत होता. चेहऱ्यावर त्याची व्यथा स्पष्ट वाचता येत होती. खांद्या पासून कळा थेट उजव्या हाताच्या बोटांपर्यंत अक्षरशः विजेच्या झटक्या प्रमाणे दोन दोन मिनिटाने त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. मानेच्या मणक्या मधल्या 6व्या आणि 7व्या vertebrae च्या मधली उशी सरकली होती आणि उजव्या बाजूच्या नसेला पूर्ण आवळून टाकत होती. शस्त्रक्रियेला पर्याय नव्हता. कष्टचं काम करत होता. डोक्यावर वजन वाहून वाहून बिगारी काम करून त्या मानेवर अनंत अत्याचार झाले होते. 

सोबत त्याची बायको आणि तिच्या कडेवर त्यांचे तिसरे मूल. पोटा पाण्यासाठी धडपड करून जेमतेम दोन वेळचे पोटभर जेवण नशिबी. बायको सुद्धा दिवस भर त्या कोवळ्या जीवाला झोळीत ठेवून राबत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजीने वीणकाम केले होते.  स्वस्तात मानेचा  MRI करून घेतला होता आणि MRI मध्ये सर्व परिस्थिती स्पष्ट दिसत होती. 

          शस्त्रक्रिया म्हणजे खर्च आलाच. त्यांनी त्याबद्दल चौकशी केली. पोट भरण्या पुरते पैसे कमावणारी ही मंडळी. शक्यच नव्हते त्यांना पैशाची व्यवस्था करणे. 

माझ्या फीज सांगायला सुद्धा मला ओशाळल्या सारखे झाले. मी काय मागू आणि ते काय देणार?गणित जुळणे अशक्य. त्यांना काही शासकीय योजने अनतर्गत काही रक्कम मिळणे शक्य होती. अगदीच तुटपुंजी होती ती रक्कम. माझी शस्त्रक्रिया करण्याची फी, त्या रकमेच्या काही पट असते. ही शस्त्रक्रिया करायला शिकण्यासाठी,मी किती कष्ट घेतले,किती अडचणी आणि प्रयत्न केले होते, ती शस्त्रक्रिया करताना मी काय रिस्क घेतो,केवढी जबाबदारी अंगावर घेतो, हे सारे त्यांना समजणे शक्यच नव्हते. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला,आणि त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता, आपण आपल्या कामाची काय किंमत सांगायची? 

आपण कुणासाठी काही प्रेमाने करतो,तेव्हा कित्येकदा समोरच्या व्यक्तीला त्याची किंमत कळते का? केलेल्या कामाची किंमत कोणी ठरवायची? मदत करणार्याने,की मदत घेणार्याने? मदत घेणाऱ्याची आपण केलेल्या मदतीची किंमत देण्याची दानत असते का? आणि दानत असून देखील त्या व्यक्तीला केलेल्या मदतीचा भाव  करण्याचे तारतम्य असते का? किंमत. कोणत्या currency मध्ये  होतो हा व्यवहार? 

   समोर बसलेल्या त्या बिचाऱ्या कडून काय मागणार मी?

त्याला सांगितलं की तूला माझ्यावर विश्वास आहे ना? म्हणजे ही शस्त्रक्रिया करताना तुझ्या जीवाला धोका आहे. स्वरपेटीच्या पडद्याची  हालचाल करणाऱ्या नसा खूप जवळ असतात आणि त्यांना धक्का लागला,तर तुझा आवाज कायमचा घोगरा होऊ शकतो. भूल देताना 2 टक्के लोकांचा रक्तदाब एकाएकी पडू शकतो.हे सारे तुला सांगितले आहे आणि त्यावर तुला स्वाक्षरी करावी लागेल.(consent)

         तो म्हणाला "साहेब,माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही बिनधास्त ऑपरेशन करा.काय झाले तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण मला ह्या त्रासातून मोकळे करा. मला जमेल तेव्हढे पैशाची व्यवस्था मी करेन.म्हेवण्या कडून, कंत्राटदारा कडून advance घेईन,पण प्लीज माझे ऑपरेशन करा. 

   त्याला मी म्हणालो "उद्या ऍडमिट व्हायला ये. हॉस्पिटल मध्ये तुला योजने अंतर्गत मदत मिळते. तूझा माझ्यावर असलेला विश्वास हीच माझी फी. 

बऱ्याच किमती, पैशात मोजता येत नाहीत. मी माझ्याकडून सर्व नीट  करेन आणि तुला तुझ्या व्यथेतून मुक्त करायचा प्रयत्न करेन."

माझ्या कन्सलटिंग मध्ये नेहेमीच गाणी ऐकत काम करतो मी. नेमके तो निघत असताना मदनमोहनजी यांच्या एका अविसमरनिय गाण्याची सुरवात झाली.  त्या पेशंटचा निरोप घेत, उस्ताद रईस खानच्या सतारीचे डोळ्यात पाणी आणणारे स्वर कानी पडले. सतारीचे स्वर इतके बोलके आणि काळजाला भिडणारे. मग त्या स्वरसम्राज्ञी देवतेचा आवाज कानी पडला.


"हम है मताये कुचा,बाजार की तरह 

उठती है हर निगाह खरीदार की तरह"


 गाणे डोळे मिटून 5 मिनिटे शांततेत ऐकत बसलो. मजरूह सुल्तानपुरी यांची शब्द रचना. काटा येतो ऐकताना.प्रत्येक जण खरीदारच असतो. किंमत आपआपल्या कुवती प्रमाणे देतो. सर्व गोष्टींची किंमत मोजावी लागतेच.स्वतःला,किंवा इतरांना. आपल्या कष्टाची,स्वातंत्र्याची,निर्णयांची. सौदा पटला,तर व्यवहार होतो. मग कधी कधी किंमत आपण केलेल्या मदतीची जाणीव. ती देखील किंमतच असते.होतो तो व्यवहारच असतो. किंमत चुकवण्याचा.

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्राचे देणे

 गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्राचे देणे. 


माझी एक मैत्रीण खूप वर्षानंतर भेटली. तिची कहाणी काही औरच होती. 

तिला तिची चूक लग्नाच्या काही महिन्यातच लक्षात आली होती. पण, तो पर्यंत दिवस गेले होते. खऱ्या अर्थाने. वर्षाच्या आतच मूल झाले आणि मग सर्व चित्रच बदलून गेले. आता, अंगावर आणखी एक जबाबदारी पडली होती. तिला चूल, मूल,आणि पैसे कमवणे,सर्वच गोष्टी एकटीला कराव्या लागत होत्या. पण,अत्यन्त धारिष्टाने,कसोशीने,आणि धीटपणे,तिने सौंसाराचा गाडा सामर्थ्याने ओढला. काळ लवकर सरत होता. मुलगी 18 वर्षाची झाली. सासर कडच्यांनी मुलीचे कान भरले. 

"तुझी आई तुझ्याकडे नीट लक्ष देत नाही. तिला फक्त पैसे कमवणे, एवढे एकमेव उद्दिष्ट."

 बाप काहीही अर्थाजन, कामधंदा करत नव्हता. घरी फाक्या मारत बसून राहायचा. बापजाद्यांची इस्टेट आहे, आणि त्या जोरावर आयुष्य भर काहीच केले नाही. आता एकटीनेच सर्व कुटुंबाचा भार पेलायला तिला अवघड जात होते. नवऱ्याकडून काहीच मदत,आधार नव्हता. एवढे सगळे करून सावरून कोणालाच त्याची जाणीव नव्हती. त्या कुटुंबात रहाणे आता तिला अशक्य झाले होते . एके दिवशी,तिने सरळ गाशा गुंडाळला आणि आयुष्य एकटीने लढायचे ठरवले. मुलगी वयात आली होती,पण तिचे कान भरण्यात आले होते आणि तिला आई बद्दल तिरस्कारच होता. मुलीच्या शिक्षणाची पूर्ण व्यवस्था माझ्या मैत्रिणीने करून ठेवली होती. 

माझ्या मैत्रिणीने ठरवले,मुलीला सत्य परिस्थिती सांगितली,तर ती सासरकडच्यांपासून सुद्धा दुरावेल. माझ्या अहंकारपोटी तिला अधांतरी ठेवण्यापेक्षा तिला सासरी सोडून, दोष स्वतःचा आहे,असे सांगून, ही नायिका बाहेर पडली आणि सासर कडून कुठलीच अपेक्षा न ठेवता,तिने आपले छोटे का होईना, स्वतःचे साम्राज्य निर्माण केले. तिच्या चुकलेल्या निर्णयाची किंमत तिला स्वतःला मोजावी लागली. ती अलीकडे भेटली. हसतमुख, आनंदी, कुठलेही किल्मिश कटुता अभिनिवेश,न्यूनगंड,न बाळगता ती तिच्या आयुष्यात सुखी दिसत होती. 

तिला विचारल्या शिवाय रहावेना. 

"तू इतके सगळे भोगून इतक्या कृतघन मंडळींना माफ कसे केलेस? कोणा बद्दल कुठलीच नेगटीव्ह भावना मनात न ठेवणे,कसे काय जमते तुला?"

तिचे उत्तर खूपच मार्मिक होते.

"दीपक, माझे भोग होते ते भोगण्या शिवाय पर्याय नव्हता. काही देणी, ही कार्मिक तत्वावर आधारलेली असतात. त्या देण्याची कारणे, हिशोब,आपल्याला ह्या जन्मी कळू शकत नाही. आपणच त्या त्या वेळी तसे तसे निर्णय का घेतो, याचे तू उत्तर देऊ शकतोस का? कार्मिक हिशोब चुकते करायचे असतात आपल्याला. तु  ह्या जन्मी ज्यांची देणी आहेत,ती परत करताना करणे शोधतोस का? एकच कारण पुरते. मी जे घेतले होते ते परत करतोय. मग मागच्या जन्मीचे देणी परत करताना फरक इतकाच,की त्या ऋणाची स्मृती नसते. पण देणे तर असतेच. उगाच त्रास करून घेतला, तर सुखाचा जीव दुःखात लोटून देतो आपण. आता ह्या जन्मात तरी कोणी नवे देणेकरी नकोत,कोणाची नवीन उधारी नको.  शेवटचा श्वास ऋणमुक्त घ्यायचा आहे मला. मनात जर कटुता बाळगली त्या सर्व मंडळींच्या बद्दल,तर ते ऋण राहील आणि ते फेडायला पुन्हा एक नवीन प्रवास. 

प्रवासाला थकले मी आता. आता एकदम कैवल्यात कायमचा मुक्काम करावा म्हणते."

         पुनर्जन्म आहे,की नाही मला माहित नाही. ह्या जन्मी जे दिले असेन, त्याचा परतावा होण्यासाठी परत यावे लागेल का? मग ह्या जन्मी दिले,ते मागील जन्माचे ऋण होते,की ह्या जन्मी नवे अकाउंट उघडत होतो? काही प्रश्न अनुत्तरित रहाणार.  उत्तरे मिळणे नाही हेच खरे. पण, तिचे तत्वज्ञान ऐकल्यावर वाटले, की त्या तत्वज्ञानाने तिचे आयुष्य नक्कीच सुखी आणि समृद्ध करीत होते. 

"गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे  देणे

माझ्या पास आता कळ्या आणि थोडी पाने"

कोणाचे किती, देणे बाकी आहे अजून कोणास ठाऊक. सरते शेवटी, ह्या अथवा मागच्या जन्माचे असेल,आयुष्य म्हणजे कार्मिक देवाण घेवाण, इतकेच असते का? हिशोब काही संपत नाही. ह्या जन्मी तर सोडाच,पुढल्या कित्येक जन्म चालूच रहाणार. कार्मिक वजा बाकी हेच आयुष्याचे अटळ सत्य. 


Dr Deepak Ranade.

रीसेट बटन

 रीसेट बटण


मोबाईल वर सकाळपासून काम करत होतो. प्रेझेंटेशन करायचे होते डिपार्टमेंटचे. स्लाइड्सवर काम चालू होते. आणि एकाएकी मोबाईल  हँग झाला. काही केल्या डिस्प्ले वर काहीच दिसत नव्हते. सर्व करून पाहिले. फोन स्वीचऑफ करून पाहिले,पण काहीच केल्या तो चालू होईना. 

शेवटी एका मित्राला विचारले आणि त्याच्या सल्ल्याने "रीसेट टू कंपनी सेटिंग" बटन दाबले. 

बराच डेटा डिलीट झाला. पण त्याला पर्याय नव्हता. फोन चालू करायचा तर स्टोर केलेला सर्व डेटा साफ होणार होता. पुन्हा पहिल्यापासून  प्रेझेंटेशन वर काम सुरू केले.

जेमतेम काम उरकले आणि हॉस्पिटल मध्ये निघालो. 

गाडीत विचार करत होतो. 

मोबाईल मध्ल्या डिलीट केलेल्या डेटा बद्दल आणि रीसेट बटणाबद्दल. डेटा गेला,पण तो किती गरजेचा होता? 

डिलीट झाल्यामुळे माझे नेमके किती नुकसान झाले? पाच सहाशे फोटो, कॉन्टॅक्टस, काही फाइल्स, आशा स्वरूपचा डेटा. ई-मेल तर सर्व क्लाऊड वर होते, बरेच फोटो देखील क्लाऊड वर synch झाले होते. 

     रीसेट बटणाने मोबाइल पुन्हा नव्याने चालू झाला. 

आयुष्यात सुद्धा काही वळणावर रीसेट बटण दाबावे लागते. आपल्या भावना,आठवणी,आवडी -निवडी,जवळच्या व्यक्ती, सर्व डेटा साठलेला असतो. काही परिस्थितींमुळे समीकरणे बदलतात आणि लक्षात येते,की डेटा corrupt झाला आहे,आणि मन हँग होते. 

काहीच केल्या मनाची हार्ड डिस्क काम करायचे बंद करते. 

'रीसेट टू कंपनी सेटिंग" चे बटण दाबावे लागते. 

सर्व डेटा डिलीट करावा लागतो. क्लेश होतात. 

काही डेटा जो क्लाउड वर sync केलेला असतो,तो retrieve करता येतो. 

रीसेट बटण दाबून टाकायचे बिनधास्त. जोपासून ठेवलेला डेटा अनावश्यक आहे, हे डिलीट केल्यावर जाणवते. कारण काहीच अडत नाही आणि उलटे, आयुष्य जास्त सुटसुटीत होते. 

रीसेट बटण दाबायला थोडे मन घट्ट करावे लागतेच.

डेटा कुरवाळायची सवय लागलेली असते. डेटा डिलीट झल्यावर थोडा वेळ, हार्ड डिस्क रिकामी रहाते. 

हार्ड डिस्कवर डेटा नाही??अरे बापरे. मग काय करू? मनाची हार्ड डिस्क रिकामी राहूच शकत नाही.

Corrupted डेटा असला तरी चालेल, पण डेटा हवाच. 

हार्ड डिस्क रिक्त करायला थोडे धारिष्ट,थोडा कठोरपणा,थोडी निर्दयता लागते. पण हँग झालेल्या मनाला पुन्हा चालू करायचे असेल,तर रीसेट बटणाला दाबावे लागतेच. रीसेट बटण दाबले,की डेटा गेला,तरी त्या जुन्या पुरण्या डेटावर आधारित दृष्टिकोन,अभिप्राय,नाती,आभास,सर्व काही डिलीट होतात. नवा गडी,नवा राज. क्लाऊड वर बॅकअप केलेला डेटा सुद्धा रिस्टोर करताना खूप विचार करून करावा. 

काही क्लाऊडवरचा डेटा सुद्धा डिलीट करावा लागतो. उगाच भावना प्रधान न होता, विवेक बुद्धी वापरून सिलेक्टिव्ह डेटा रिस्टोर करावा.

मोबाईल ची स्पीड वाढते, तसे मन सुध्दा चपळ होते. उगाच corrupted डेटा मध्ये रेंगाळत बसत नाही. 

चला तर मग. 1,2,3........

"रीसेट टू कंपनी सेटिंग."


Dr Deepak Ranade

आयुष्याचे गणित

 आयुष्याचे गणित.


सकाळचे 9.30 वाजले होते. नानांची पूजेची वेळ. त्यांची लगबग चालू होती. जानवे पाठीवर चोळत ते फुले  ताम्हनात घ्यायला ओट्यापाशी पोचले. 52 वर्ष संसार केलेली त्यांची पत्नी त्यांना बघत होती. त्या माउलीला श्वास घेणे जड जात होते. अर्धांगवायू झाला होता तिला,आणि ती अंथरुणाला खिळूनच होती. फुफुसांचा विकार असल्यामुळे,तिला सतत ऑक्सिजन मास्क मधून घ्यावा लागायचा. तिला सकाळपासूनच  श्वास घ्यायला त्रास होत होता. छातीचा भाता, जमेल तेवढे जोर लावून ती माऊली दमली होती.  येणारे मरण आता पुढच्याच वळणावर थांबले आहे,याची जाणीव होती. 

  गेल्या 2 वर्ष,अंथरुण धरल्या पासून नानांनी तिची सर्व शुश्रूषा अगदी अचूक केली होती. रोज रात्री,वेळी अवेळी उठून,डायपर बदलणे, पाणी आणून देणे, ही नित्याची ड्युटी ते चोख बजावायचे. नाना हे अत्यन्त कर्तृत्ववान. घरच्यांशी भांडण झाल्यावर, बायको आणि 2 मुली सोबत घेऊन त्यांनी 2 छोट्या खोल्यांमध्ये संसार थाटला. अपार कष्ट,कामात अतिरेकी प्रामाणिक,एकही दिवस सुट्टी न घेणारे आदर्श अकाउंटंट. त्यांनी अथक 33 वर्ष चाकरी केली,आणि रिटायर झाल्यावर त्यांच्या मालकांनी रीतसर सर्व ग्रॅचूईटी, फंड सर्व देऊन पुन्हा दुसऱ्या दिवसापासून ऑनररी नेमणूक केली. त्यांच्या प्रमाणिकतेची किंमत अनमोल होती. नानांना एकदा जवाबदारी दिली की विषय संपलाच. त्यांच्या आयुष्यात त्यांनी खचितच कधी  चूक,अथवा हलगर्जीपणा केला नसेल. आपल्या प्रमाणिकतेचा,कर्तबगारीची,आणि सरळ पडणाऱ्या पाउलचा त्यांना प्रचंड अभिमान. अभिमान,की अहंकार? कोणास ठाऊक. पण सगळी नातेवाईक मंडळी त्यांचा खूप आदर करत.  2 पोळ्या आणि भाजीचा डबा, तीच स्कुटर,तोच रस्ता,तीच बॅग,आणि तीच ठरलेली वेळ. 33 वर्ष. आयुष्याचे ठोकताळे अगदी गणिती. कोणाकडून कधीच काही घेतले नाही,ह्या आत्मनिर्भरतेचा प्रचंड अभिमान. नानांना कधीच रिकामे बसलेले कोणीच बघितले नाही. दिनचर्येत प्रत्येक क्षणाला काय करायचे,हे पूर्वनियोजित.अगदी रोबॉटीक आयुष्य. रुमालाची घडी कशी घालावी,इथ पासून,ते स्टेपलेर च्या क्लिप्स हॉल मधल्या लाकडी कपाटाच्या उजव्या बाजूच्या वरच्या ड्रॉवरच्या डाव्या कोपऱ्यात प्लास्टिकच्या डब्बीतच. त्यांच्या आयुष्याचे मूलभूत तत्व-

A place for everything and everything in its place. 

साचेबंद आयुष्य.  काही साच्या बाहेर असू शकतच नव्हते. नानांच्या या गणिती आयुष्यात भावनांना जागा नव्हती. भावना,ओलावा,लवचिकता,सहृदयता ह्या गणितात बसवणे शक्य नाही. गणित या विषयाला कोरडेपणाचा शाप असतो. थोडेफार इकडे तिकडे, तेवढं समजून घ्या, हा अघळपघळपणा गणितात वर्ज. नानांनी घर सोडले, त्याचे मूळ कारण त्यांच्या पत्नीवर केलेले खोटे आरोप. आईनेच आपल्या पत्नीवर केलेले नानाविध आरोप सर्रास खोटे आहेत हे ठाऊक होते नानांना. त्यांच्या अहंकाराला ठेच लागली. पण आपल्या सहचरिणीची बाजू घेऊन घरच्यांना तोडीसतोड उत्तर न देता, त्यांनी सामान आवरून परत त्या घरची वाट धरली नाही. 

अपमान त्यांच्या पत्नीचा झाला,हे महत्वाचे नव्हते. त्यांचा अपमान झाला होता. नानांच्या पत्नीला बोलले होते घरचे. घोर अपमान. 

त्या माउलीने एकही शब्द न बोलता पोटच्या 2 मुली आणि तुटपुंजा संसार खकोटीला घेऊन नानंबरोबर तिने घर सोडले. तिचा अपमान झाला होता हा विषय कधीच चव्हाट्यावर आला नाही.

नानांनी पुनश्च अगदी सुतातून संसार सुरू केला. खाऊन पिऊन सुखी आशा थाटात पुढची अनेक वर्षे लोटली.

नानांची नियमावली, त्यांची गणिते,त्यांचं मोजून मापून जगलेले आयुष्य. त्यांनी त्यांच्या बहिणीच्या संसारात आलेल्या अडचणी अनेकदा सोडवल्या. त्या सोडवण्यात देखील,त्यांच्यावर बेजबाबदरीचा आरोप कोणी चढवू नये,हा गणिती हेतू. चौकटीतील नियमावली ही महत्वाची. कालांतराने मुलींची रीतसर लग्ने लावून दिली. त्याचे गणिती प्रयोजन त्यांनी करून ठेवलेच होते. 

आयुष्यातल्या परीक्षेत पडलेले सगळे प्रश्न त्यांनी अचूक उत्तरे देत सोडवले. आयुष्यतली गणिते  नीती आणि रितीचे फॉर्म्युले वापरून नानांना पैकी च्या पैकी मार्क मिळाल्याचा अभिमान त्यांच्या वर्तणुकीत आणि डोळ्यात ठासून भरलेला स्पष्ट दिसायचा. 

      आता वर्धक्यात सुद्धा,स्वतःची कामे स्वतः करण्यात ते व्यस्त असायचे. बायकोच्या आजारपणात त्यांनी तिची पूर्ण देखरेख केली होती.

कोणी कुठलाच आक्षेप घेणार नाही, असा चोख कारभार. रात्री वेळी अवेळी नुसती त्या माउलीने हाक द्यायची खोटी. नाना ताडकन उठून तिच्या सेवेस हजर. 

    एकदा त्या माउलीने सहज नानांना सुचविले,की मी देह सोडल्यावर तुम्ही आपल्या थोरल्या मुलीच्या घरी मुक्कामाला जा. हे ऐकताच नानांनी तिला फैलावर घेतले.

"तुला अक्कल आहे का? मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. मला कोणाचीच मदत लागत नाही. माझं मी बघून घेईन."

त्या माऊलीच्या डोळ्यच्या कडा ओलावल्या.

म्हंटले,तर तिच्या नवऱ्याने तिची अहोरात्र सेवा केली होती. नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. कधी कधी तिला ह्यांनी जवळ बसून केसातून हात फिरवावा, एवढी क्षुल्लक अपेक्षा तिने केली होती. पण ते होणे नाही,याची त्या माउलीला जाणीव होती. तिने ते सत्य स्वीकारले होते. गणिताच्या रुक्ष कोरडेपणात भावनांचा ओलावा कधीच नसणार हे तिला माहीतच होते. 

आता, ती शेवटचा श्वास घ्यायच्या मार्गावर होती. 

तिला बोलणे देखील अवघड होते. नाकावर ऑक्सिजन चा मास्क होता. तिने खुणावून नानांना बोलावले. नाना त्यांच्या पूजेत गर्क होते. त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. पूजेत व्यत्यय झालेला त्यांना अजिबात खपेना. मना विरुद्ध ते ताम्हन खाली ठेऊन तिच्या जवळ आले. 

तिच्या डोळ्यातुन आसवे ओघळत होती. तिला त्यांचा अखेरचा निरोप घ्यायचा होता. तिने हात वर करीत नानांचा हात हातात घ्याचा होता.

नानांनी हातात बेलाची पाने आहेत, असे खुणावून दाखवले.

त्या माऊलीने उचललेला हात पुन्हा हळूच खाली ठेवला. आणि पुढच्या क्षणी,तो हात निश्चल झाला होता. 

नानांनी तिच्या नाकाजवळ  बेलाची पाने असलेला हात नेऊन,ती श्वास घेत नाही हे तपासले. 

पूजेत खंड झाला होता. 

बेलाची पाने त्यांनी परत फुलांच्या ताम्हनात ठेवली. 

आता,गणिती पद्धतीने तिचे पुढील सोपस्कार नाना अचूक बजावण्या मागे लागले. 


Dr Deepak Ranade.

बिंब प्रतिबिंब



        बिंब- प्रतिबिंब


प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे, कधी बिंबालाही नाही कळले

बिंब होते लोभस,निर्मळ,शुद्ध

होते  स्वयं, अव्यक्त  बुद्ध

अपेक्षांच्या चिखलाने सारे मळले

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले


प्रतिबिंबाला नव्हतेच कधी बिंब पसंत

नसलेल्याचीच होती असलेल्या पेक्षा खंत

बिंबाला सुधारण्याचे केले प्रयत्न कोरून

व्यर्थात टाकले बिंब पूर्ण पोखरून

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे,कधी,बिंबालाही ना कळले


बिंबाला नव्हती कोणतीही आसक्ती

स्वयंसिद्ध, जाणिवेत केवळ अद्वयभक्ती

प्रतिबिंबाने जागविला द्वैताचा भास

आरंभला काम, क्रोध,वासनेचा प्रवास

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे,कधी,बिंबालाही ना कळले


प्रतिबिंबाने बिंबाला चकवले क्षणात

बिंबाच्या अस्तित्वावर केला आघात

तू खोटा मीच खरा अवघे भासवले

बिंबाच्या पावित्र्याला सहजच नासवले

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे कधी बिंबलाही ना कळले


बिंबाला कधी होणार साक्षात्कार

बिंबाचे स्वरूप  निर्गुण निराकार

प्रतिबिंब काल्पनिक, क्षणिक नश्वर

बिंब स्वतःच साक्षात परमेश्वर

प्रतिबिंबाला बिंब जेव्हा उधळेल

 तेंव्हाच बिंबाला बिंबत्व कळेल


डॉ दीपक रानडे

डब्बे संसार आणि बरेच काही

 डब्बे आणि सौंसार


"अगं, तुला पर्वा सुरळीच्या वड्या दिल्या होत्या ना,तो डब्बा जरा प्लीज दीपक बरोबर परत पाठव"

लहानपणी, मी शेंडेफळ असल्यामुळे असली किरकोळ कामे माझ्याच पदरी पडायची. मग सायकल वर टांग मारून त्या कुसुम सोसायटी मधल्या मावशिंकडे वाटचाल करायची.

तो प्लास्टिकचा 5 ईंची डब्बा आणायला माझा वापर केला गेला,याचे दुःख आणी त्याहून अधिक कमालीचे आश्चयर्य आणि थोडा संताप.

एवढे काय सोने लागले होते त्या डब्ब्याला? प्लास्टिकचा दीड दमडीचा तो डब्बा. आईसक्रीम चा कधीतरी आणलेला फॅमिली पॅक चा तो डब्बा. आईने तो धुवून पुसून तिच्या नेटक्या सौंसरात त्याला योग्य जागा नियोजित करून दिली होती. तसे आमचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी,इतकेच. आईने टूकीने सौंसार केला होता. राहण्या खाण्याच्या गोष्टींमध्ये कुठलीही काटकसर नव्हती. मग ह्या प्लास्टिकच्या डब्ब्यात काय एवढा जीव अडकलेला होता तिचा? 

     स्वयंपाकघर म्हणजे आईचे साम्राज्य होते. 

'Everything in its place, and a place for everything.'

     अगदी  क्वचित कळी आई बाहेर असली आणि बहिणीला काही नवीन रेसिपी करायला किचन मध्ये काहीतरी हवे असले,तर ती आईला मैत्रिणीकडे फोन करायची आणि मग आई तिला

"फ्रिजच्या बाजूचे कपाट उघड. डाव्या बाजूला,वरच्या कप्प्यात,कोपऱ्यातून तिसरी,हिंगाची छोटी डबी असेल. त्या डब्बीवर एक छोटी प्लास्टिकची डब्बी आहे. त्या डबीत खसखस आहे. 

    इतक्या छोट्या डब्ब्यांची तिला अचूक पॉझिशन, माहीत असायची. 

   हळदी कुंकू, भोंडला,डोहाळे जेवण,आशा बायकी 

गेट टुगेदर  सोहळ्यामध्ये बरेचदा छोट्या स्टीलच्या डब्या भेट म्हणून दिल्या जायच्या. मला ह्या छोट्या डब्यांविषयी  खूप कुतूहल असायचे. पण, आईच्या सौंसरात त्या डब्यांचे जरा अधिकच महत्व आहे,याचे कारण उमजेना. 

कधी कधी, शेजारच्या मावशी आईला छोट्या डब्यात कालवण द्यायच्या. त्या CKP होत्या,आणि बिरड्याचे कालवण म्हणजे आहाहा.  त्या वयात ते आम्हाला पुरतच नसे. तरी, त्याचा स्वाद,आणि लज्जत काही औरच. मग,तो डबा धुवून,आमच्याकडे नारळ घालून पडवळाची भाजी,असेच काही खास बनवले,की त्या डब्याच्या माध्यमातुन cultural exchange व्हायचा. 

डबा कधीच रिकामा नाही परत करायचा. हे डब्याच्या राजकारणातला अत्यन्त म्हत्वाचा नियम. 

कधीकधी,आईने बाजूच्या जोशी काकूंकडे असाच एखादा खाद्य पदार्थ पाठवलेला असायचा.  मावशिंकडून डबा परत करायला थोडा उशीर झाला,तर आईचा जीव वरखाली व्हायचा. मग एखाद दोन दिवस वाट बघून,दुपारी आईचा मावशिंकडे फेरफटका असे.

"अहो जोशी वहिनी,पर्वा सांडगे पाठवले होते तो जरा डब्बा द्याल का? अहो जाऊबाईना थोडे लोणचे पाठवावे असे म्हणते."

कसले लोणचे,आणि कशाला आई काकुला लोणचे देणार? पण तो डबा परत मिळाला नाही तर? 

डबा. खरच किती छोटी गोष्ट.

आता, काही करणासत्व स्वतः  किचन मॅनेज करतो. पर्वा, एक पॉटलक पार्टी ला गेलो होतो.  मी, आमचा अंजना बाईने बनवलेली भाजी एका छोट्या डब्यात घेऊन गेलो होतो. 

खूप धमाल अली पार्टीला.

निघताना,मी मैत्रिणीला म्हणालो-

"अंग जरा तो प्लास्टिकचा डबा विसळून देशील का? "काही भरू नकोस त्यात  पण डबा प्लीज दे."

तिने जरा कुत्सित स्वरात विचारले

"एवढे काय मोलाचे लागले रे त्या डब्याला?

तेव्हा मला एकदम जाणवले.

काही गोष्टींचे मोल त्यांच्या किमतीवर अवलंबून नसते. त्यांची किंमत त्यांच्या उपयुक्तते नुसार ठरते. तो प्लास्टिकचा  डबा होता अगदी दीड दमडीचाच. पण वेळेला,पटकन काहीतरी पॅक करून न्यायला लागते,तेव्हा त्या डब्याचे मोल जाणवते. सौंसरात पडल्यावर बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. 

त्यातला महत्वाचा एक चॅपटर म्हणजे डब्याचे महत्व.

मैत्रिणीने रीती प्रमाणे डब्यात शंकरपाळे दिले होते. ते तोंडात टाकत त्या डब्याला भरभरून आशीर्वाद देत, घराची वाट धरली.


Dr Deepak Ranade

दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समायी काहे को दुनिया बनायी,

 व्यवधान


भोमे काकांबरोबर गप्पा मारताना त्या गप्पा अध्यात्माकडे अगदी नकळत वळण घ्यायच्या. अशाच एका दिवशी सकाळी हॉस्पिटलला जाण्यापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असे वाटले आणि मग गाडी 10 मिनीटात त्यांच्या दारात.

त्या देवतुल्य गृहस्तांच्या पाया पडलो आणि त्यांच्या जवळ बैठक मांडळी. त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मोघम चौकश्या करून झाल्यावर मी त्यांना माझ्या मनात बरेच दिवस घुटमळत असलेला प्रश्न विचारला. 

तो परमात्मा जर स्वयंसिद्ध असला,तर मग त्याने हे ब्रह्माण्ड कशा साठी निर्मिले? 


"दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समायी

काहे को दुनिया बनायी,

तुने काहे को दुनिया बनायी "


 खरच हा एवढा पसारा इतकी जीववैविधता इतकी अफाट सूर्यमाला, galaxies, stars वगरे कशासाठी?

मानव,त्याची नाती, सुखदुःख,आजार,जन्म मृत्यू, सर्वच अनाकलनीय. 

असा थोडा क्लिष्ट प्रश्न विचारला,की

भोमे काकांची एक विशिष्ट reaction  असायची. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलायचे आणि मग दोन मिनिटे शांतता. मग ते डोळे मिटून 3 ते 4 खोल श्वास घेत. आणि मग डोळे उघडून माझ्याकडे intensely बघायचे. 

मग काही सेकंदानंतर बोलायला लागायचे. 

    अरे, हे सारे ब्रह्माण्ड म्हणजे त्या ब्रह्माची स्वतःला असण्याची जाणीव होण्यासाठी केलेला कल्पना विलास. 

त्या परमात्म्याला आपण असल्याची देखील जाणीव नसते. नेणिवेची ती निर्गुण निराकार अवस्था. मग, आपण आहोत याची जाणीव होण्यासाठी त्या तत्वाला व्यक्त होण्यासाठी सगुण साकार स्वरूपात व्यक्त व्हावे लागले. 

"A holomovement in its awareness, to become aware of its own beingness."

हे वाक्य मी " I AM THAT " या पुस्तकात वाचले होते. त्या वाक्याची आठवण झाली. 

     म्हणजे त्या ब्रह्माला सुद्धा आपण आहोत, याची जाणीव होण्यासाठी अद्वैतातून द्वैताकडे प्रवास करावा लागला. 

The observer and the observed cannot exist separately. They are essentially one, as is the act of observation.

म्हणजे,मीच मला बघतोय. 

पण परमात्म्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी दुसऱ्याची निर्मिती करावी लागली. 

मग मला सुद्धा माझ्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी कोणाची तरी गरज लागणारच.माझ्या अस्तित्वाची जाणीव आणि अस्तित्वाचा अर्थ द्वैतातूनच समजणे आले. माझ्या आयुष्यला अर्थ हा इतर व्यक्तींकडूनच प्राप्त होत आहे. माझ्या आयुष्ट्याचा अर्थ व्यक्ती सापेक्ष आहे. मग मैत्री,नाती,नातेवाईक,प्रेयसी,प्रियकर,हे सारे त्या मूलभूत अर्थ शोधण्याची साधनेच आहेत. केंद्र स्थानी असतो मी,आणि माझ्या असण्याला अर्थपुर्ण करण्यासाठी केलेली धडपड म्हणजेच का आयुष्याचा अर्थ? 

काहींना त्यांच्या असण्याची जाणीव होण्यासाठी कुठली तरी activity, कौशल्य,कला,करून अर्थ शोधतात. 

पण मी आहे,याची प्रचिती काहीतरी करून,किंवा कोणाबरोबर तरी राहूनच येते. त्यालाच व्यवधान म्हणावे लागेल. मग व्यक्ती,नाती,ही प्रसंगानुरूप बदलतात इतकेच. प्रत्येकाला वाटते,की ही अमुकामुक व्यक्ती खरच माझ्यावर निरपेक्ष प्रेम करते. 

पण आपल्या आयुष्यात कोणीतरी व्यक्ती असणे,हीच मूलभूत अपेक्षा असते. त्या व्यक्तीकडून काही अपेक्षा नसेल,पण व्यक्तीची अपेक्षा असतेच. आपल्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी. 

जिथे,  ब्रह्माला सुद्धा व्यक्तीची गरज झाली आणि मग स्वतःच नानाविध प्रकारांनी व्यक्त झाला, तिथे म्या पामराची काय अवस्था? 

      माझ्या प्रश्नाचे म्हणावे तसे उत्तर काही मिळाले नाही मला. भोमे काकांच्या पायी पडलो आणी निरोप घेऊन हॉस्पिटलकडे कूच केली. नाही उमगणार या प्रश्नाचे उत्तर. 

दुनिया बनानेवाले, क्या तेरे मन मे समायी

काहेको दुनिया बनायी ????


Dr. Deepak Ranade.

Neurosurgery - A quantum Skill

 Neurosurgery- A quantum art.


The tumor was truly intimidating. It was almost occupying a fourth of the entire cranial cavity. The relatives as usual  asking the same old questions that assume I'm in total control of the eventual outcome.

What's the guarantee of success? Will our patient be able to lead a normal life after the surgery?

Visions of torrential bleeding from that vascular meningioma flashed across my eyes as I gave them the same old answers. 

I was really worried, and yet had to project an omnipotence, a  calm confidence, that was in sharp contrast to what was going through my mind. 

Can I simultaneously be worried, and confident? Am I Schizophrenic? 

  The surgery gets underway. The first thing I noticed after I have opened the cranium is the tense brain. It makes me far more tense. Those gray convolutions of the cerebral cortex are thinned out by that monster lying underneath. I'm cramped for space. I have to plead, with that overlying brain to relent a bit to give me access. I have to be firm, and yet gentle as I endeavor to retract that stretched, tensed tissue. Firm and gentle at the same time? Schizoid. I eventually make some headway and catch the first glimpse of that reddish brown tumor. It doesn't look too happy to see me. As I touch it with my bipolar forceps, it erupts very sanguinely. The tumor is very vascular and firm. It's going to be a tough nut to crack. 

I coagulate a 2 cm strip on the tumor and incise the capsule. It bleeds mercilessly. 

I grab my bipolar forceps, coagulate the raw area, almost apologetic  for my indiscretion. 

    This alternate "attack and apologise" schizophrenic dichotomy continues for the next few hours. I'm blessed to have a CUSA at hand. This device liquefies that firm gritty tumor, reducing it's egoistic unyielding demeanor to a compliant subservience. But it is a slow process. I then decide to zoom out and have a birds eye view of the tumor. The operating microscope tends to tunnel my vision. I need to have a Schizoid admixture of  tunnel vision as well as a comprehensive birds eye vision.  I get to the point of having debulked a sizeable portion of the tumor. 

Now comes the most critical part of separating it from its adherence to the adjacent brain and the vital blood vessels, that course over the dome. 

I gently push a cottonoid between the tumor and the compressed brain, and simultaneously exert gentle traction on the capsule of the tumor. A bloody dangerous game of pulling and pushing at the same time. This is really getting more and more Schizoid. 

 Eventually, after about 5 and half hours, I have separated the capsule from all around and I gently tease it away from the base. 

I'm done. I ensure the integrity of all the adjacent blood vessels, and structures and finally wash out, leaving the closure to my assistant. 

As I deliberate on the surgery whilst having a cup of coffee in the Surgeons Room, it strikes me like a flash. 

I have to be in a similar state as that of the photon.  A  wave and a particle at the same time. Quantum physics believes completely in  that dichotomy of 'And'.

It renders the "either - or " philosophy of classical physics to an extinct anachronism. 

I pride myself on the quantum state of  "worried and confident, gentle and firm, attack and apologize, pulling and pushing, tunnel and birds eye views". I'm not Schizoid. I'm in a state of quantum superposition of being in multiple states of mind at the same time. The surgical exercise becomes a symphony of ebony and ivory and all the shades in between.  The ultimate quantum superposition of course - being human and God at the same time. Human with all my limitations and God for the patient.


Dr. Deepak Ranade.

श्रद्धास्थान

 श्रद्धास्थान


रुग्णाच्या नातेवाईकांबरोबर संवाद साधणे,हे सर्जनचे शस्त्रक्रियेच्या अगोदरचे एक महत्वाचे काम असते. 

मेंदूची शस्त्रक्रिया,म्हणजे सर्व नातेवाईकांची चांगलीच तंतरलेली असते. 

आमच्या पेशंटला ऑपरेशन नंतर नॉर्मल आयुष्य जगता येईल का? ऑपरेशन नंतर शुद्धीत यायला कितीवेळ लागेल? ऑपरेशन करण्यात किती धोका आहे?

ऑपरेशन यशस्वी होण्याची काय गॅरंटी आहे? 

अनेक प्रश्न. काहींची उत्तरे देऊ शकतो,काहींची उत्तरे देणे अशक्य. गॅरंटी वगरे मुद्दे काढले,की मग,मी शांतपणे त्यांनाच उलट प्रश विचारतो.

" मी उद्या सकाळी जिवंत असून, ऑपरेशन करायला वेळेत पोचेन, याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का?"

प्रश्न विचारणाऱ्या व्यक्ती एकाएकी शांत होतात. गॅरंटी. पुढच्या श्वासाची शाश्वती नसताना, मग 5 तास चालणाऱ्या, मेंदूच्या अवघड ठिकाणी असलेल्या गाठ काढण्याच्या ऑपरेशनची गॅरंटी देणारा मी कोण? 

मी देव,हा anthropological (व्यक्तिसापेक्ष,सगुण साकार) असल्याचे मानत नाही. व्यक्तिसापेक्ष देव म्हंटला,की मग त्या देवाला खुश ठेवणे,त्याला आमीष दाखवून,सौदेबाजी करणे, तो शब्द न पाळल्यास त्याचा कोप होणे, हे सारे ओघाओघाने आलेच.

काही नातेवाईक ऑपरेशनच्या दिवशी कडक उपास करतात, नवस बोलतात,अखंड जप चालू ठेवतात. 

परमेशवर हा खरोखर इतका अहंकारी असेल का? श्रद्धा म्हणजे त्या व्यक्तिसापेक्ष देवाला खुश ठेवणे, त्या देवाचा अखंड जप करणे, असेच का? 

कदाचित, हा सारा खटाटोप मनाला शांत ठेवण्यास उपयोगी पडत असेल. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक आशेचे निरंजन तेवत ठेवायचे. 

श्रद्धा,ही कुठल्यातरी ठोस व्यक्तिसापेक्ष देवावर असल्यास,त्या दैवताशी संभाषण साधता येते. हट्ट करता येतो. मनातील इच्छा बिनधास्तपणे व्यक्त करता येतात. 

   मी ऑपरेशन सुरू करायच्या अगोदर hands scrub करताना मनात एक छोटीशी प्रार्थना म्हणतो.

माझ्या हातात नसलेल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारी ती अधिभौतिक शक्ती, त्या शक्तीला अभिवादन करतो. त्या शक्तीला माझ्या हातावर वास करण्यासाठी आमंत्रित करतो. ती अज्ञात शक्ती,माझ्या कल्पनेच्या पलीकडची आहे, याची जाणीव असते. मी सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेऊ शकतो, ऑपरेशन 100 टक्के यशस्वी करणे हे सर्वस्वी माझ्या हातात असण्याचा उन्मत्त फाजील अहंकार न बाळगणे, हे ऑपरेशन चांगले होण्यासाठी खूप महत्वाचे. 

माझ्या दृष्टीने श्रद्धा ही माणसाचा अहंकारावर अंकुश ठेवण्याचे एक अमौलीक साधन. केवळ स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर आत्मविश्वास बरेच वेळा घातक ठरू शकतो. 

माझी श्रद्धा,-  मी चूक करू शकतो , माझ्या हाता बाहेर बऱ्याच गोष्टी असतात, याचा भान राखणे. ऑपरेशन करण्यापूर्वी थोडी भीती असतेच. ही भीती देखील श्रद्धेचीच अभिव्यक्ती असते. अनेकदा, ओव्हरकॉन्फिडेन्स मुळे, अडचणीत सापडलेले,पाहण्यात आहेत. श्रद्धा म्हणजे कुठेतरी नतमस्तक होणे. नतमस्तक कोणाला होता,हे महत्वाचे नसते. शस्त्रक्रिया करताना प्रत्येक स्टेप ही केवळ माझ्या बुद्धीतून ठरवली जात नसते. बरेचदा, instinct च्या आधारे,शस्त्रक्रियेतील काही भाग करावा लागतो. एखाद्या महत्वाच्या रक्तवाहिनी जवळ चिकटलेली गाठ सोडवताना नकळत देवाचे नाव ओठांवर आपोआप तरंगायला लागणे, ही श्रद्धा. ऐन वेळेला सुचलेली एखादी स्टेप, विशिष्ट ठिकाणी ठराविक instrument वापरण्याचा निर्णय,आकस्मित होणारा रक्तस्राव काबूत आणण्यासाठी ती रक्तवाहिनी अचूकपणे coagulate करता येणे,आणि हे सर्व करीत असताना, भूलतज्ञानकडून रक्त दाब, ऑक्सिजन saturation व्यवस्थित नियंत्रित होणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे. असल्या  बऱ्याच गोष्टी जेव्हा व्यवस्थित घडतात, आणि रुग्ण बरा होतो,नातलग मनपूर्वक आभार प्रदर्शन करतात. आशा वेळी, ती  शस्त्रक्रिया यशस्वी होण्यामागे त्या अज्ञात शक्तीचे समरण करून, काहीही अनपेक्षित अघटित घडले नाही, यासाठी त्या शक्तीचे आभार मानून, नम्रपणे त्यांचे कौतुक कबूल करणे,म्हणजे श्रद्धा. 

आयुष्यात काही कडक नास्तिक मंडळी सुद्धा भेटली. त्या व्यक्तींच्या अविर्भावातून, आपण नेहेमीच बरोबर असतो, एक कुत्सित self righteousness त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवतो. ही मंडळी बरीच यशस्वी सुद्धा असतात. त्यांच्या यशाचा,त्यांच्या गुणांचा त्यांना सार्थ अभिमान असतो.  त्यांच्या वागणुकीत,"आपल्या हातून कधीच चुका होऊ शकत नाही" चा दर्प असतो. 

त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यास, ते मोठ्या शिताफीने,त्यांची बाजू मांडतात आणि आपणच कसे बरोबर होतो,हे पुनःश्च सिद्ध करतात. असल्या मंडळींच्या बद्दल नेहेमीच कुतूहल वाटते. They wear an armour of infallibility. अचूकतेचे कवच. 

ह्यांना कुठलेतरी श्रद्धास्थान असते का? ह्यांना त्यांच्या चुका समजतच नाहीत का?  की त्या समजल्या,तरी कबूल करण्याचा मोठेपणा नसतोच? नाही मला या प्रश्नाचे उत्तर सापडले अजून. चुकलेल्या निर्णयामुळे, चुकलेल्या वागणुकीमुळे झालेले नुकसान पेलण्याचे सामर्थ्य असते या मंडळींमध्ये. कोणाचेच कोणा वाचून अडत नसते,हे तर ब्रह्मसत्य आहेच. त्यामुळे असल्या मंडळींचे आयुष्य अगदि व्यवस्थित चालू राहते. 

आपल्याकडे त्रयस्थपणे बघणे,ही श्रद्धा. आपल्या वागणुकीत किंवा बोलण्याने जवळचे दुखवले जाऊ शकतात, ही जाणीव म्हणजे श्रद्धा. 

श्रद्धा,म्हणजे केवळ कुठल्या दैवतावर असलेला दृढ विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे,आपण परफेक्ट नाही,आपल्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात, ही जाणीव. श्रद्धा म्हणजे माणसाला माणूस असण्याची  असलेली जाणीव.श्रद्धा म्हणजे  माणसाचा माणुसकीत असलेला विश्वास. 


Dr Deepak Ranade.

एकांत

 एकांत. 


नुकताच हिमालयात एक अवघड पण डोळ्याचे पारणे फिटणारा ट्रेक केला.

या ट्रेकचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, स्वतःला स्वतःचा  तंबू उभारावा लागायचा. हिमालयाच्या रौद्र पण अविसमरणीय रांगड्या सौंदर्यात,निसर्गाच्या कुशीत, अगदी थेट डोंगरावर तंबू ठोकून, दमलेले शरीर आणि डोंगराच्या मध्ये फक्त एक ग्राऊंडशीट. स्लीपिंग बॅग मध्ये शिरून मग एकटेच तंबूमध्ये विसावायचे. 

असेच एका रात्री एकाएकी पहाटे 3 ला जाग आली. लघुशंका उरकण्यासाठी तंबूतून बाहेर पडलो. ती रात्र मंत्रमुग्ध करणारी होती. चांदण्यात समोरची हिमशिखरे मंद प्रकाशात चकाकत होती. डोक्यावर अथांग अखंड आकाश आणि त्यामधील अगणित तारका. हलक्या मंद वाऱ्याची झुळूक चेहेऱ्याला कुरवाळत होती.

एकांत. स्वतःच्या श्वासोश्वासाचा आवाज ऐकू येत होता. टेंटच्या फ्लॅपच्या मधूनच फडफडण्याचा निनाद. 

या अथांग निसर्गात तो तंबू म्हणजे,सागरात एक छोटासा बुडबुडा असल्याजोगे. त्या एकांतात नात्यांचे,रुणानुबंधांचे भावनिक पापुद्रे गळून पडले होते. माझ्या नग्न अस्तित्वाची जाणीव होत होती. कोहम कोहम हा प्रश्न सतत डोके वर काढत होता. 

मी स्वतःला नेहेमीच नातेसंबंधाच्या चष्म्यातून बघत होतो. माझ्या आयुष्याचा अर्थ इतरांच्यावर अवलंबून असतो का? माझे विचार माझ्या आईच्या दिशेने वळले. तिने गेली 10 वर्षे माझ्या दिवंगत वडिलांसाठी झुरत आयुष्य ढकलले आहे.  ते गेल्यावर देखील ती ते नाते एक भावनिक कुबडी म्हणून वापरत होती. तिला कितीही समजावून सांगितले,तरी तिला बदललेले वास्तव कबुलच करायचे नव्हते. नाती,ही आयुष्यात किती महत्वाची असतात? वैयक्तिक माझ्या आयुष्यात नुकतेच नात्यांची उलथापालथ झाली होती. Do relationships define me? माझे आयुष्य नात्यांचे मिंध्ये आहे का?

 तंबू उभारताना 5 ते 6 लोखंडी पेग्स जमिनीत खोचून,मग त्या तंबूच्या कडांमधून 2 वाकणार्या फोल्डिंग रॉड्सची फ्रेम वापरवी लागायची. तेव्हा तो तंबू उभा रहायचा.  आपल्या अस्तित्वाला देखील असेच नात्यांचे टेकू देऊन आणि रुणानुबंधाची फ्रेम लावून उभे राहतो का आपण ? 

मन,बुद्धी,अहंकार,नाती,ऋणानुबंध,हे आयुष्यातील अविभाज्य घटक असतात. हे अस्तित्वाच्या तंबूचे पेग्स खोचून,मग स्वत्वाचा  तंबू ठोकायचा. एखादा पेग उचकटला,तर अस्तित्व धोक्यात आल्याचे भय. 

तंबूत असे पर्यंत सुरक्षित वाटते. तंबूच्या बाहेर पडल्यावरच भोवतालच्या अथांग अवकाशाची जाणीव होते. कोहम,या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळणार नाही, पण जेव्हा या स्वनिर्मित तम्बूचे सर्व पेग्स उखडून टाकता येतील, तेव्हा कोहम हा प्रश्न विचारणारा देखील नसणारे. बुडबुडा सागरात काहीच काळ आपल्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारू शकतो. त्याचे सागरात वेगळे अस्तित्व किती काळ राहणार? कधीतरी नकळत,तो सागरात विलीन होणारच. आत्मचिंतन करता करता गारठलो आणि त्या आनंतातून पुन्हा माझ्या सुरक्षित संकुचित तंबूत शिरलो. 

त्या विशाल पर्वताच्या कुशीत विचार करता करता कधी डोळा लागला कळलेच नाही. 

सकाळी टेंटचे पेग्स काढताना चेहऱ्यावर एक विलक्षण भाव होता, हे मात्र नक्की.


Dr Deepak Ranade.

वो अफसाना जीसे अंजाम तक

 वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन 

उसे इक ख़ूब-सूरत मोड़..........


3 तास झाले होते. तो ट्युमर अत्यन्त किचकट आणि चिवट होता. मेंदूच्या अगदी डेखा पासून पुढील डोळ्याच्या मागील भागात पसरला होता. त्या ट्युमरने मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या सर्वात महत्वाच्या रक्तवाहिनीला (carotid artery) पुर्ण विळखा घातला होता. तो ट्युमर अवघ्या मध्यम आकाराच्या पेरू एवढा होता. पेशंट 62 वर्षाची माऊली होती. तिचा रक्तदाब काही केल्यास नियंत्रणात येत नव्हता. सर्वसाधारणतः मेंदूची शस्त्रक्रिया करताना रक्तदाब 70 ते 80 mm ला खाली ठेवला जातो. ट्युमर मधून होणाऱ्या रक्तस्रावावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे खूप मोलाचे साधन असते. पण या माऊलीचा रक्तदाब काही केल्यास 140 mm पेक्षा खाली येतच नव्हता. अशाच काही बिकट परिस्थितीत त्या ट्युमरने मारलेली घट्ट मिठी हळू हळू सोडवण्याचे काम चालू होते. प्रत्येक ट्युमर वेगळा असतो. प्रत्येक ट्युमरचे आपापले एक unique व्यक्तिमत्व असते. काही ट्युमर मऊ असतात,काही कडक. काही मेंदूला घट्ट मिठी मारून बसतात,तर काहींच्या मिठीची पकड थोडी शिथिल असते. काही ट्युमर इतके काही मेंदू सारखेच दिसतात,की नेमका ट्युमर कुठचा,आणि नॉर्मल मेंदू कुठचा,हे कळणे कर्म कठीण. 

Tissue texture, म्हणजे, इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने स्पर्श करून, त्या स्पर्शावरून  ट्युमर की नॉर्मल मेंदू, याचा तपास करावा लागतो.

आजचा ट्युमर खूपच चिडका होता. थोडासा तुकडा काढला तरी लगेच भुसभुस रक्तस्राव चालू. प्रत्येक ट्युमरचे वेगवेगळे स्वभाव. काहींना गोंजारत गोंजारत विनवण्या करीत अलगद हळुवारपणे मिठी सोडवावी लागते. काहीवेळा,थोडा आक्रमक पवित्रा घेऊन, एखाद्या तटस्थ ट्युमवर तुटून पडावे लागते. ट्युमरशी झुंज देता देता, पहिल्या तासातच ट्युमरचा चांगला परिचय होतो. मनोमनी ट्युमरशी संवाद साधायला सुरू करतो.

Microscope वेगवेगळ्या दिशेने फिरवत त्या ट्युमरला वेगवेगळ्या angle ने बघावे लागते. कधीकधी मनात त्या ट्युमर बद्दल विलक्षण आदर वाटतो. ह्या ट्युमर बरोबर अजिबात शहाणपणा चालणार नाही,ह्या ट्युमरला घाबरायचे काहीच कारण नाही, असे मनोमनी ठोकताळे बांधायचे. ट्युमरशी शत्रुत्व न बाळगता,प्रेमाने त्याचा विळखा सोडवायचा,हेच धोरण योग्य. 

आजचा ट्युमर मात्र मेंदूच्या जरा जास्तच प्रेमात होता. त्याने मारलेली मिठी सोडवणे कर्म कठीण. खूपच गुंतागुंतीचे नाते होते. जोर लावणे,हा पर्याय नव्हता. त्या ट्युमरच्या घट्ट आणि ताकदवान बाहुपशातून सोडवले, हात सोडवून झाले होते, पण शेवटची करंगळी सुटता सुटत नव्हती. 

   ट्युमरचा तो एक इवलासा भाग रक्तवाहिनीशी जसा काही एकजीव झाला होता. सोडवताना हृदयाचे ठोके वाढत होते. AC असून देखील,भोवयीवर टेन्शन घामाच्या बिंदूच्या रूपाने झीरपले होते. जाऊदे. 

दोन मिनिटे, microscope बाजूला केला आणि 5 ते 6 मोठे श्वास घेतले. 

ट्युमरचा तो भाग काही केल्या सुटत नव्हता. तो सोडवण्यासाठी जीव धोक्यात टाकायचा, की नाही,हा अवघड निर्णय घेण्याची वेळ येते. 

खूप प्रयत्न करून देखील तो क्षण येऊन ठेपतो. काही नात्यांचा पूर्ण विळखा काहीही केल्यास सुटत नाहीच. आपला थोडासा भाग मग तसाच ठेवावा लागतो. ती करंगळी तशीच रेंगाळत ठेवून द्यावी. कदाचित विळख्याच्या ताकदीची आठवण म्हणून.

    एकदम साहिरच्या  त्या  अविसमरणीय गाण्याच्या ओळी समरल्या.

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,

असे इक खूबसुरत मोड देकर  छोडना   अच्छा............


काही वेळा, काहीतरी सोडून द्यायला देखील किंमत मोजावी लागते. आपल्या अहंकाराची. 

जैन तत्वज्ञानात ह्याला अवमौदार्य असे म्हणतात. शिखर सर करायची पूर्ण क्षमता असताना देखील, शिखर सर न करता शिखराच्या अलीकडे थांबायचे.

शिखर सर केल्याने अहंकार बळावतो. 

"Discretion is the better part of valor."

नम्रपणे माघार घेणे,ह्यातच शहाणपणा. 

सुदैवाने, पेशंटचा रक्तदाब वगरे इतर सर्व parameters stable झाले आणि मग closure करायला सुरुवात केली. 

अनाहूतपणे,एक गाणे गुणगुणत होतो. 

"स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकात केव्हा

गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा "


Dr. Deepak Ranade.

4 As to 8As

 Lifelong obsession with the 4 As. 


I was reminiscing about the book Fountainhead the other day. The memories about the book and it's protagonist were stirred up in the context of architecture and the construction of my Farmhouse. 

I had never imagined the impact a fictional character can have on my psyche. 

Howard Roark. 

I was wondering, what immortalised  that character, and left an indelible footprint in the mind of most readers. What was so unique and fascinating about his persona? 

      My thoughts go into overdrive. Slowly, the fog of adulation clears  permitting greater clarity. There was a casual disdain, almost a contemptuous disregard,  stemming not from any negativity or bitterness. An overwhelming self assurance, an assertive, composed self confidence. An equanimity, that stabilized and aborted any emotional contortions. An unpredictability, that anhilated the rote, the mundane and the trivial. 

       And then the one thing, that really stood out. His total alienation from the 4 As. The 4 As - Acceptance, Approval, Acknowledgment and Appreciation. If one introspects deeply, it will become clear, that our lives are held hostage by these 4 As. It could be a consequence of living in society. Social considerations, norms, peer pressure, an unavoidable hierarchy, a never ending game of one-upmanship, the eternal struggle to keep ahead of the pack. 

     I realise this obsessive, perhaps subconscious compulsion truly handicaps and diverts our energies and efforts. 

The time devoured by this perpetual  anxiety about what others think about us is truly unwarranted. The ever increasing connectivity lavished by internet and applications of social media fuels this indefatigable urge to enhance, amplify, cosmetically decorate ones impression.

I must confess, that I am myself, a victim of this scourge. It is on this backdrop, that the enigma of Roark truly intrigues and inspires. His quasi-autistic self indulgence, bordering on heresy, apparently antisocial demeanor could be regarded as pathological in these days and times.

But, deep down, there's much more substance and rationale in this quixotic attitude. There's a method to his madness.

    A method, that perhaps liberates from the shackles of subservience to the 4 As. He was almost a hermit. A man totally self sufficient emotionally and otherwise. A man, who knew exactly what he wanted. Every thought and action were directed more importantly for his own evolution, and not for enhancement or cultivation of an impression for public consumption. 

Cultivated and crafted impressions shift the truth of life from reality to the deceptive virtual. He was a man, who lived in the now. The now, that's devoid of another 4 As. Anxieties,apprehensions, aspirations and ambitions. 

Roark was and will remain an enigma, a state of mind, an ideologue, who paves a path to salvation, liberation from not just 4 , but 8 As. The first four As- 

Acceptance, Approval, Acknowledgement, Appreciation which inevitably lead to the next 4As- Anxieties, Apprehensions, Aspirations and Ambitions. 


Dr. Deepak Ranade.

असाध्याची साधना

 असाध्याची साधना.


तो लहानपणा पासूनच चपळ आणि धडपड्या होता.सतत अस्वस्थ,आणि बेचैन.खोल कुठेतरी एक ऊर्जेचा वणवा पेटल्या सारखे.अस्वस्थतेचे कारण त्याला किंवा इतरांना सुद्धा उमजेना. ऊर्जा अनेक प्रकारच्या अस्तात. त्याची ऊर्जा जरा वेगळ्याच प्रकारची होती. त्या उर्जेमध्ये एक वेगळीच ताकद होती. ती ताकद,ती ऊर्जा त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. त्याच्या पळण्यामध्ये एक वेगळाच डौल होता.  पळणे,हे जात्याच त्याच्या नसानसात भरलेले होते. त्याची ती विलक्षण ऊर्जा,बेचैनी आणि अस्वस्थता समूहातल्या इतरांना जाचायची. समूहातील इतर समवयीन, काळाच्या ओघाने पळू लागलीं. त्यांचे पळणे,हे साचेबद्ध,कोष्टकात, शिकवणीतले,आणि प्रशिक्षित असे. कळपात सर्वांचे  पळणे त्याच प्रकाराचे, आणि ह्याचे पळणे वेगळे. त्याची वेगळे पळण्याची शैली  कळपातील इतरांना झेपायची नाही. त्यांच्या नजरेत एक प्रशचिन्ह असे- 

तू सर्वांसारखा का पळत नाहीस?  त्याला स्वतःला सुद्धा आपला वेगळेपणा जाणवत होता. सुरवातीला त्या वेगळेपणाचे कुतूहल वाटायचे इतरांना. पण ते वेगळेपण जेव्हा चौकटीत बसेना, तेव्हा ते वेगळेपण थोडे बोचरे वाटू लागले. त्याला स्वतःला आपल्या वेगळेपणाची जाणीव होत नव्हती. पण कळपातील इतर त्या वेगळेपणाची अवहेलना करू लागल्यावर त्याच्या मनात,हळू हळू न्यूनगंडाचे बी रुजले. 

चार चौघांपेक्षा वेगळे असणे,म्हणजे एक विकृतीच अशी भावना कळपात प्रचलित होती. आपले  वेगळेपण, हा एक शाप असल्याची भावना हळू हळू मनात घर करू लागली आणि त्या न्यूनगंडाच्या बिजाचे रोपटे दिवसेंदिवस वाढू लागले. कालांतराने,त्याची दौड आता सर्वांपेक्षा खूपच वेगळी झाली होती. 

काही तर खूपच सरस दौडत होते.शर्यतीत दौडण्याची कला काही वेगळीच होती. त्याने  आपल्या अनोख्या शैलीत स्पर्धेत दौडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण शर्यत जिंकण्यासाठी लागणारी कौशल्ये,ही वेगळी होती. स्पर्धेत उतरण्यासाठी,चार चौघांशी बरोबरी करून, त्यांच्यातील उणिवा अभ्यासणे,स्पर्धेचे नियम,अटी, पाळणे क्रम प्राप्त होते. स्पर्धा म्हंटली,की त्याच्या पळण्याची मजाच निघून जाई. सगळे रेसचे घोडे. एकाहुन एक आपल्या परीने खानदानी, नामांकीत तालमीत  नियोजनबद्ध प्रशिक्षण घेऊन, स्पर्धेत उतरण्यास सज्ज. त्याला तसा खानदानी काहीच वारसा नव्हता. पळण्याच्या विश्वात बेवारस. आपल्याला जमेल,तसे आणि कुठल्याही शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब न करता शर्यतीत उतरायचे म्हणजे एक मूर्खपणाच होता. पण रेस चा घोडा म्हंटला,की स्पर्धेत पळणे अनिवार्य. स्पर्धा हेच आयुष्य. त्याला इतर घोड्यांची नावे देखील माहीत नव्हती.  तसे पाहता, त्यांना नावाचा काहीच उपयोग नव्हता. त्या वर्तुळात, फक्त नंबर महत्वाचा. शर्यतीत, कितवा आलास, किंवा शर्यत चालू असताना कोणत्या क्रमांकावर पळतोय,हीच त्या घोड्याची ओळख. रेस संपायची,पण स्पर्धा अखंड चालूच. एखाद्या रेस मध्ये ह्या घोड्याला पहिला नंबर,तर दुसऱ्या रेस मध्ये दुसरा  घोडा पहिला. पळणे,हे केवळ रेस जिंकण्यासाठी,आणि रेस जिंकणे, हेच आयुष्याचे उद्दिष्ट. हे रेसचे घोडे नुसते उभे राहिले असले तरी मनात,शर्यत चालूच. कधी दौड पायांची,तर कधी दौड मनाची. दौड चालूच. रेस जिंकण्याच्या ध्यासाने, पळण्याचा आनंद कुठेतरी हरपला होता. त्याला हे पळणे आणि रेस जिंकणे,हे फारच निरर्थक वाटू लागले होते. 

     काही घोड्यांनी,रेस जिंकण्याच्या पाठी न लागता, आपले शांतपणे टांग्याची बग्गी ओढणे पसंत केले. अशाच एका घोड्याशी ओळख झाली आणि गप्पा मारायची संधी मिळाली.

 त्या घोड्याला त्याने विचारले-" तू स्पर्धेतून बाहेर का पडलास? "

 तो घोडा म्हणाला- मला स्पर्धा नको वाटते. 8 तास कष्ट केले,की मालक पोटभर जेवायला देतो,आणि मग तबेल्यात शांतपणे उभे राहून,निवांत आयुष्य जगायचं. कोणाशी स्पर्धा नाही,की कुठलेच टेन्शन नाही. मस्त चाललंय आयुष्य."

  त्याला हा युक्तिवाद पटेना. घोडा असून, पळायचे नाही,आणि केवळ टांगा ओढून आयुष्य काढायचे. छे छे. हे नाही जमणार. पळायला तर पाहिजेच.  पण स्पर्धा नको झाली होती त्याला. का कोणास ठाऊक, पण स्पर्धेत जिंकलो तरी स्पर्धा पळण्याचा आनंद  स्पर्धेमुळे हरवला होता. त्याला काहीच सुचत नव्हते.

पाळण्याचे दोनच प्रकार असू शकतात का? टांगा किंवा रेस ?

काही केल्यास त्याला या प्रश्नाचे उत्तर उमजत नव्हते.

एक दिवस, रेस दुसऱ्या गावी असल्यामुळे त्याला वाहनाने दुसऱ्या गावी नेण्यात येत होते. दोन तासाचा प्रवास होता. वाटेत छोटासा घाट लागला आणि तो चढून झाल्यावर, एक मोठे हिरवे गार पठार लागले. एकदम त्याची नजर दूरवर एका उमद्या घोड्यावर गेली. चॉकलेटी आणि पांढरा रंग होता त्याचा. तो सुसाट पळत होता. त्याच्या मानेवरचे पांढरे शुभ्र आयाळ वाऱ्या मध्ये प्रत्येक झेपे बरोबर लाटांसारखे डोलत होते. 

त्याच्या धावण्यात एक धुंद बेफिकिरी होती. त्याचा डौल काही आगळाच होता. एकटाच त्या हिरव्या गार पठारावर मनमोकळा स्वैराचार करीत होता. त्याच्या प्रत्येक झेपेमध्ये एक  लय होती. पळण्याच्या कृतीत एक कला होती. त्याचा सुडौल बांधा, भक्कम मजबूत पायाचे स्नायू त्या चकाकणार्या त्वचे खाली सळसळत होते. त्याच्या पाळण्यात एक विलक्षण सहजता आणि काव्य होते. त्याला कुठल्याही प्रकारची घाई नव्हती,की कुठलेही उद्दिष्ट गाठण्याचे वेड नव्हते.

   त्याच्या पाळण्यात कुठलीच धडपड, आटापिटा,आकांत,नव्हता. त्याचे पळणे एक प्रकारचा चिदविलास होता. त्या पाळण्यात एक रांगडेपण होते, एक नजाकत सुद्धा होती,पण उन्मत्तपणाचा किंवा माजाचा लवलेश नव्हता. तो स्वतःच्या आनंदासाठी पळत होता कारण पळणे हा स्वधर्म होता. कुठल्याच प्रकारची कृत्रिमता नव्हती. त्या क्षणी, त्याला रेस,आणि टांगा, ह्या दोनच परिचित असलेल्या पळण्याच्या प्रकारांपेक्षा  कित्येक उंचीचा तिसरा प्रकार बघायला मिळाला. स्वतःसाठी पळणे. शर्यत केलीच तर स्वतःची स्वतःशीच. 

त्या घोड्याचे पळणे बघून तो मंत्रमुग्ध झाला होता. आणि मग त्याने एक महत्वाचा निर्णय घेतला. 

आता तो जरी रेस मध्ये पळाला,तरी,तो स्वतःच्या आनंदासाठी पळणार होता. पळण्याचा पूर्ण मजा लुटणार . त्याला त्याचा स्वरूपाची जाणीव झाली होती.  आता पळणे,ही केवळ कृती नसून,एक साधना आहे. 

काहीच न साध्य करण्याची साधना. 


Dr. Deepak Ranade.

विश्वास हा नेहेमीच अंध असतो

 विश्वास,श्रद्धा,धाडस,दैव,कर्म,बेफिकिरी..........


"तुला मी खरे काय ते सांगणार आहे. पेशंट पासून काही लपवून ठेवले,आणि शेवटी त्याला सत्य कळले,तर बऱ्याच जणांना विश्वासघात झाल्यासारखे वाटते.म्हणून,सत्य कितीही कटू असले तरी ते सांगितलेले कधीही इष्ट. "

त्या 28 वर्षाच्या युवकाला हे सांगितल्यावर तो थोडा सिरीयस झाला.

"तुझ्या मानेच्या मणक्यामध्ये (cervical spinal cord)एक 2 इंच लांब आणि पाऊण इंच जाड गाठ आहे. ती गाठ ऑपरेशन करूनच काढावी लागेल. दुसरा कुठलाच पर्याय नाहीये."

    दोन मिनिटे शांतता. कोणी काहीच बोलत नव्हते. पेशंटचा भाऊ आणि एक मित्र,असे तिघे जण माझ्याकडे टक लावून बघत होते. 

मी उगाच एवढे स्पष्ट बोललो की काय? 

"जोर का झटका धीरेसे" द्यायला हवा होता का? असो. मी ठरवलं होतं,की आता,जे अनिवार्य असते,ज्याला दुसरा काहीच पर्याय नाही,ते सरळ,सोप्या स्पष्ट भाषेत सांगून टाकायचे. बरेचदा,जे अद्यारुत असते,पण भीतीपोटी व्यक्त केले जात नाही, ते अव्यक्तेपण खूप ताण वाढवते. मग हळूच इकडून तिकडून indirectly प्रश्न विचारत,अधिक मानसिक वेदना आणि कल्पनाशक्तीविलास. 

दोन मिनिटांनी त्या पेशंटनेच उद्गार काढत ती गूढ शांतता मोडून टाकली. 

"डॉक्टर,मणक्याच्या आत गाठ आहे,म्हणजे मणका चिरून ती गाठ काढायला लागेल का? आणि तसे करताना पुढील आयुष्यात अपंगत्व येईल का? "

आता मी धर्मसंकटात सापडलो होतो.

"शस्त्रक्रियेनंतर तुझ्या हाता पायाची ताकद तात्पुरती,किंवा क्वचितकाळी कायमस्वरूपी कमी जास्त होऊ शकते. खचित तुला प्रदीर्घ काळ ventilator वर देखील ठेवावे लागू शकते. कारण गाठ श्वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या मानेच्या मणक्याच्या त्या नाजूक भागात आहे." आता एकदा स्पष्ट बोलायचे ठरवले आहे,तर मग होऊन जाऊदे. 

पुन्हा,शांतता. ते तिघे एकमेकांकडे बघत होते. पुढे काय बोलायला उरलेच नव्हते. आर या पार. 

       मला वाटले होते,की ही मंडळी आता "बरे आहे,आम्ही विचार करून तुम्हाला कळवू." असे नेहेमीचे वेळ काढू उत्तर देऊन क्लिनिक मधून पाय काढतील.

पण त्यांच्या प्रतिक्रियेने मलाच धक्का बसला. पेशंटनेच डायरेक्ट मला विचारले-

"डॉक्टर, ऑपरेशन करायचं आहे मला. ऍडमिट कधी होऊ?"

मला दोन मिनिटे काहीच सुचेना. मलाच शंका आली,की ह्याला मी सांगितलेले नीट कळले आहे का? की  संभाव्य धोके पुन्हा समजावून सांगावे? 

मी त्याला ऍडमिट व्हायला सांगितले आणि ऑपरेशनची तारीख ठरवून टाकली. 

ह्या पेशंटच्या डाव्या हातात मुंग्या आणि बधिरपणा,एवढाच त्रास होता. एवढी मोठी गाठ त्याच्या मणक्याच्या आत असेल,ह्यावर कोणाचाही विश्वास बसला नसता.

MRI बघितल्यावरच खात्री पटायची. मानेचा मणका तसा खूपच नाजूक.हाताच्या अंगठ्या एव्हढ्या जाडीचा,पण मानेखालच्या सर्व शरीराचे नियंत्रण करणाऱ्या नसा तेवढ्या भागात घट्ट पॅक बंद असतात. शिवाय,श्वास घेण्याचा सर्वात महत्वाचा स्नायू ,diaphragm च्या नसा देखील याच भागातून निघतात. 

आता,ऑपरेशन करताना,हा मानेचा मणका उभा चिरून,1 cm खोल जाऊन ती गाठ काढायची होती. 

हातापायांची ताकद कायमस्वरूपी कमी होण्याची दाट शक्यता होती. ह्या तरुणाचे उभे आयुष्य जगायचे राहिले होते(अजून अविवाहितच होता). ऑपरेशन टेबल वर घेताना पूर्ण धडधाकट असणारा. खूप मोठा धोका पत्करत होतो मी. संभाव्य धोके डोळ्यासमोरून फ्लॅश होत होते. बरेचदा,पेशंट आणि नातेवाईक ह्यांचे 'अज्ञानात सुख'अशी अवस्था असते.सर्जनलाच सत्य परिस्थिती घाबरवत असते.

पेशंट माझ्यावर विश्वास ठेवून मोकळा झाला होता. मलाच त्या विश्वासाचे ओझे पेलायचे होते.

त्याचा निर्णय,हा विश्वास,की अंधविश्वास? आयुष्यावर उदार होऊन केलेले धाडस की मनाचा समतोल राखून निवडलेला व्यवहारी प्रॅक्टिकल मार्ग? 

कोणास ठाऊक काय म्हणावे त्याच्या या वागणुकीला.

मी अधिक विचार न करता कामाला लागलो.

ऑपरेशन करण्यापूर्वी tractography नावाचा MRI करून घेतला. या MRI मध्ये मानेच्या मणक्यातून प्रवास करणाऱ्या सर्व tracts ची रचना आणि गाठीमुळे कशा प्रकारे दबले गेलेत, याचा सखोल अभ्यास करता येतो. या tractography च्या फिल्म्सचा खोलात जाऊन 3 ते 4 तास अभ्यास केला.

ऑपरेशन करताना SSEP आणि MEV ही नसांची मोनिटरिंग करणारी आधुनिक प्रणाली वापरायचे नियोजन केले. 

ऑपरेशन सुरू केले. मणका एक्सपोस केला. मध्य भागात रक्तवाहिन्या नसलेल्या प्लेन microscope मधून अचूक टिपला. छातीत धडधड चालू होती. मग देवाचे नाव घेत,तो मणका उघडला. मोनिटरिंग सतत चालू होतेच. थोडे आत गेल्यावर ती तांबूस रंगाची  गाठ दिसली. मोठी होती. 

मग मन एका वेगळ्याच अवस्थेत पोचले. पुढील एक तासात अत्यन्त शांतपणे,CUSA हातात घेऊन हळू हळू ती सगळी गाठ काढली. ती मनाची अवस्था शब्दात व्यक्त करणे कठीण. त्या क्षणात माझे स्वतःचे अस्तित्व नाहीसे होते. भय,आपल्या अहंकाराचीच अभिव्यक्ती असते. जिथे माझे वेगळे अस्तित्व नसते,अहंकार नसतो,तिथे उरते केवळ जाणीव. भय हे  भूत, भविष्य या काळाच्या कल्पनेतच असते. त्या क्षणात पूर्ण लक्ष केंद्रित केले, की भयाचा लोप होतो. उरतो केवळ तो क्षण.मग त्या अवस्थेत,काळाचा भान हरपून जातो. उरतो केवळ भावनातीत, साक्षीभाव. त्या अनाकलनीय आदी शक्तीवर एक दृढ विश्वास,श्रद्धा असते. ती शक्ती माझ्या हातात उतरली आहे, याची खात्री मनात ठेवून शस्त्रक्रिया चालू राहते. दृष्टा, दृष्टी,दृष्य ही त्रिपुटी एका विलक्षण अद्वैतात विरघळून जाते. 

 अखेर, गाठ पूर्ण निघाली आहे,याची खात्री करून मी gloves काढले. पुन्हा त्या आदिशक्तीला नमन करून मी सर्जनरूम मध्ये कॉफी मागवली. 

 काल हा तरुण टाके काढायला क्लिनिकला आला होता. त्याला बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्याला घट्ट मिठी मारली. त्याचा माझ्यावर असलेला विश्वास,की माझा त्या शक्तीवर विश्वास,की त्याचे आणि माझे धाडस,की आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवतेचे कर्तब? कोणीच ह्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकणार नाही. काही प्रश्न अनुत्तरीतच राहिलेले बरे. 


Dr Deepak Ranade. 


लुप्त होत जाणारी मूल्ये

 लुप्त होत जाणारी मूल्ये


वृन्दाला सांगितलं मी उषा मावशीला बरोबर सकाळी 7 वाजता घ्यायला येतो. तुम्ही खाली येऊन थांबा.

म्हंटल्याप्रमाणे मी 7च्या ठोक्याला वृन्दाच्या सोसायटी बाहेर गाडी उभी केली. आणि वृन्दा त्या माऊलीचा हात धरून तिला माझ्या गाडीत बसवले. 

उषा मावशी सुंदर सिल्क साडी घालून, हातात पर्स,आणि एक छोटीशी पिशवी घेऊन माझ्या गाडीत आसनस्थ झाली. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा होती. सतत हसतमुख, आणि प्रेमळ स्वभावाची उषा मावशी माझ्या आईची बालपणाची मैत्रीण. वयाच्या 17व्या वर्षा पासून त्या दोघींची ओळख. हिंदी राष्ट्रभाषेच्या वर्गात प्रथम ह्या दोघी एकाच बाकावर बसायच्या. आई आमची अबोल. उषा मावशी सांगत होती,की 3 महिने एकाच बाकावर बसून देखील एकही शब्द बोलल्या नाहीत दोघी जणी. 

पुढे, j j school of arts मध्ये परत एकत्र आल्यावर कुठे वाचा फुटली. पण त्या नंतर, दोघींचे खूप जिव्हाळ्याचे नाते उलगडत गेले.

     उषा मावशीचा संसार मुंबईत झाला. मी 7 वर्षाचा असताना आई बरोबर तिच्या घरी गेल्याचे आठवते. तेव्हा तिने प्रेमाने आमचे आदरातिथ्य करून, मला खेळायला भोवरा दिला. काही आठवणी कारण नसताना अगदी स्पष्टपणे आठवतात. तिचा तो प्रेमळ चेहरा, तिने केलेले लाड, तोंड भरून कौतुक, काळजात कुठेतरी खोलवर अजून जोपासून ठेवले आहे.

      उषा मावशी आणि माझी त्यानंतर   गाठभेट कमीच. तिचे यजमान उत्तम ज्योतिषशास्त्र जाणत.  आई माझ्या  पत्रिकेबद्दल बरेचदा त्यांच्या कडे चौकशी आणि  विचारपूस करत. कालांतराने उषा मावशीची कन्या पुण्यात वास्तव्यासाठी आल्यामुळे तिच्या घरी माझे येणेजाणे व्हायचे. काही वर्षांपूर्वी  उषा मावशीचे यजमान कैवल्यवासी झाले. मुलगा आणि सून अमेरिकेत स्थायिक,त्यामुळे आपल्या 75 वर्ष वास्तव्य केलेल्या घरी ती एकटीच.

तिला मुलीने पुण्यात शिफ्ट होण्यास आग्रह केला,पण तिने त्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. 

आज बऱ्याच दिवसानंतर उशा माउशीला भेटण्याचा योग आला. ती मुलीकडे काही दिवस मुक्कामाला आली होती. मी ठरवले,की तिला गाडीत घालून माझ्या आईकडे घेऊन जाईन. बाल मैत्रिणींची गाठ घालून देण्याचे पुण्य. 

  गाडीत बसल्यावर आमच्या गप्पा चालू झाल्या. 

तिच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने एक स्वावलंबता जाणवत होती. तिच्या व्यक्तिमत्वात एक सुडौलता,आणि ग्रेस होती. बोलताना,कुठेही आग्रही,हट्टी किंवा कोणाबद्दल टीका नव्हती. दैवाने जे काही तिच्या पानात वाढले होते,ते अत्यन्त चवीने आणि कुरकुर न करता ह्या माउलीने शांतचित्ताने ग्रहण केले. तिच्या व्यक्तिमत्वात एक ठेहेराव,स्थैर्य, तृप्त सम्पन्नता जाणवत होती. कुठेही,एकटेपणाचा त्रास किंवा कंटाळा नव्हता. तिच्या बरोबर विरोधी पावित्रा माझ्या आईचा. आपला साथीदार जीवनाचा प्रवास अर्ध्यात सोडून 11 वर्षे उलटली,तरी ती त्या दुःखातून बाहेर आली नव्हती. तिला तिचे आयुष्य कसे जगते असे विचारता तिने काही अमौलिक सल्ले दिले.

"आयुष्य सुटसुटीत ठेव रे. आपणच आपल्या आयुष्याचा फापट पसारा वाढऊन ठेवतो. भावना,आठवणी,ऐहिक गोष्टी,पैसालत्ता या साऱ्याचे वजन डोक्यावर बाळगून आयुष्य जगलो,तर मग ते कारण नसताना कष्टाचे बनवून टाकतो. मी माझ्या एकटेपणाचा कधीच स्तोम माजवला नाही. हे गेल्याचे दुःख निश्चित उरात बाळगते आहे,पण शेवटी,आयुष्याचे पुढचे पान उलटावे लागतेच. नव्या पानावर स्वतःची उत्क्रांती कशी होणार, यावर चिंतन करते. माझे छंद जोपासते,तब्येतीची काळजी घेते. स्वतःशीच मैत्री करणे,हे खूप महत्वाचे. मित्र परिवाराच्या गोतावळ्यात स्वतःचे स्वतःशी नाते कुठेतरी लुप्त होते. सगळे जण शेवटी आपापल्या संसारात व्यस्त होतात. भावनिक दृष्ट्या आपण कधीच कोणावर परावलंबी नसावे. त्याची खरंतर गरजच नसते. आपल्या मनाचे ते सारे खेळ असतात. "

उषा मावशी खरच खूप हलक्या, शुद्ध अंतःकर्णाची असल्याचे जाणवत होते. तिच्या मध्ये वात्सल्य,प्रेम,ममत्व  भरभरून होते,पण, जेव्हा इतरांना मोकळे सोडून द्यायची वेळ आली, तिने तिच्या रुणानुबंधांतील अपेक्षांच्या साखळ्या काढून टाकल्या आणि स्वतःला आणि इतरांना मुक्त केले. तिच्यात कुठेच कोरडेपणा नव्हता. इतरांवर माया नक्की करावी,पण स्वत्व विसरून नाही. शेवटी स्वतःवर असलेली माया,हीच आयुष्य सुखी आणि समाधानी करते. 

त्या दोघी जिवलग मैत्रिणीची गाठ घालून देताना एक आगळाच आनंद झाला. कित्येक दशकांच्या त्यांच्या नात्याचा सुगंध त्यांच्या डोळ्यात दिसत होता. तो दरवळणारा सुगन्ध मनमुराद लुटत मी माझ्या वाटेला लागलो. आजकालच्या व्यवहारी नातेसंबंधांकडे पहाता,उषा मावशी आणि तिची विचार सरणी  त्यांच्या पिढीबरोबर लुप्त होत चालली की काय, ही शंका मनात कुठेतरी येऊन गेली. 


Dr. Deepak Ranade.

कभी खुद पे कभी हालात पे

 'कभी खुद् पे कभी हालात पे रोना आया'


     एका 11 वर्षाच्या मुलाचा बाप समोर येऊन बसला होता. त्याच्या मुलाची मान जन्मताच एका बाजूला वळलेली होती. आता तो 11 वर्षाचा होता तो आणि अलीकडे त्या मुलाला चालायला आणि पळायला त्रास व्हायला लागला होता. तो बाप बर्याच लांबुन आला होता मला भेटायला. बरोबर मुलाचे CT स्कॅन घेऊन आला होता.

  CT स्कॅन बघितल्यावर लक्षात आले की त्याच्या मुलाला एक फार विचित्र craniovertebral junction वैगुण्य होते. मानेच्या नंबर 2 मणक्याचा दाता सारखा एक खुंट,ज्यावर पहिला मणका आणि डोके फिरते, वर  सरकला होता आणि माने मधल्या मज्जातंतूंवर दाब देत होता. कवटी मधून spinal cord मणक्यात उतरतो,तिथेच तो खूप जास्त प्रमाणात चेपला गेला होता. त्या बाळाची मान खरच खूप अवघड परिस्थितीत होती. 

     मी त्याला ट्रीटमेंट बद्दल थोडे फार समजवून सांगितले आणि थोडी जुजबी चौकशी केली. तो बाप गॅरेज मध्ये कामाला होता. आर्थिक दृष्ट्या खूपच हालाकि परिस्थिती होती. मी त्याला धीर दिला आणि सांगितले की ट्रीटमेंट क्लिष्ट आणि ऑपरेशन धोक्याचे आहे. 

     पुढच्या प्रश्नांची उत्तरे त्या बापाला देता येत नव्हती. तो हुंदके देत होता. त्या बापाची त्याच्या मुला करता काळजी,धडपड,जाणवत होती. त्याची ती अवस्था बघून माझे डोळे सुद्धा पाणावले. 

   आशा,अडचणीच्या केसेस ट्रीट करताना डॉक्टर असल्याचा शाप जाणवतो. परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे,हे लक्षात येते,पण सर्व क्षेम आहे,आशा अविर्भावात आपल्या भावना,भीती,हतबलता दडवून, पुढचे पाऊल उचलायचे. हृदयात भावनांचा कल्लोळ चालू असतो,कधी कधी हृदय पिळवटून जाते. विशेष करून,तरुण पेशंटना काही जीव घेणा आजार असल्यास, त्यांच्या पालकांच्या जीवाची घालमेल,बघवत नाही. वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यास करता करता या शास्त्राच्या मर्यादा देखील माहिती असतात. त्या मर्यादांनी आपले हात बांधून टाकलेले असतात,आणि तरी देखील समोर बसलेल्या रुग्णनातेवाईकांना मोठ्या आत्मविश्वासाने धीर द्यायचा. आशा वेळी रफीचे ते अजरामर गाणे मनाच्या रेकॉर्ड प्लेयर वर वाजू लागते.

     "कभी खुद् पे कभी हालात पे रोना आया"

आपल्याला ठाऊक असते,पुढचे चित्र स्पष्ट दिसत असते,आणि तरी,त्या विव्हलणार्या नातलगांची समजूत काढायची.

एका मुलाखतीत नुकतेच मला हा सतत भेडसावणारा प्रश्न विचारला गेला होता. पेशंटला ट्रीटमेंट करताना तुम्ही भावनिक दृष्ट्या त्या केस मध्ये अडकता का? 

     Natgeo च्या एका प्रसिद्ध wildlife फोटोग्राफर ची काही वर्षांपूर्वी पाहिलेली मुलाखत आठवली. हा फोटोग्राफर केनिया मध्ये फोटोग्राफी करीत होता. जीप गाडीतून खोल जंगलात वाट काढत असताना,त्याला एकदम एका झाडाखाली एक नवजात हरणाचे पिल्लू दिसले. त्या पिल्लाची आईपासून फारकत झाली असावी. त्या पिल्लाला काहीच उमगत नव्हते. सैरभैर अवस्थेत,ते इकडे तिकडे चाचपडत फिरत होते. आणि मग थोड्या अंतरावर त्या फोटोग्राफर ला झुडपात एक चित्ता दिसला. पुढचे चित्र अगदी स्पष्ट दिसत होते. त्या नवजात हरिणाच्या पिल्लाचे काहीच क्षण आयुष्य उरले होते हे उघड होते. त्या फोटोग्राफर च्या मनाची अवस्था आणि घालमेल कमालीची होती. एक मन त्याला सांगत होते,पटकन त्या बछड्याला उचलून जीप मध्ये घेऊन सुरक्षित ठिकाणी पोचवावे. दुसरे मन सांगत होते की निसर्गाच्या,नियतीच्या नियमांचे उल्लंघन करू नये. फोटोग्राफर आणि फोटोग्राफी, ही बघ्याची भूमिका घेणे.

 अत्यन्त जड अंतःकरणाने तो तिथून काहीही न करता पुढचे सारे अनिवार्य प्रसंग कॅमेरा मध्ये टिपतो. प्रथम दर्शनी ह्या गृहस्थाला पाषाण हृदयी,असंवेदनशील,क्रूर असे समजू शकतो,पण थोडा खोलवर विचार करता, त्यानी त्याच्या भावनांवर अंकुश ठेवत, त्याचे काम चालू ठेवले. तसे केले नाही,तर रफी साहेबांच्या गाण्यातल्या पुढल्या ओळी सारखी अवस्था व्हायची. 


बात निकली तो,हर इक बात पे रोना आया...........


भावनावंश होऊन काहीच साध्य होत नसते. संवेदनशीलता ही कर्तव्यदक्षते मध्ये कधीच अडथळा बनु  नये. त्या कर्त्याकरवित्याच्या मनात काय आहे,कोणास ठाऊक आणि त्याने जसे निर्मिले, ते आपण स्वीकारून त्याची कारण मिमौंसा न करता, जमेल तसे आपले कर्म करीत रहाणे,हाच उचित मार्ग. दया, सहृदयता, करुणा, ह्या भावना जर आपल्याला कमजोर करणार असल्या,तर त्यांना चार हात लांब ठेवलेलेच बरे.

तो बाप त्या मुलाला ऍडमिट करायला घेऊन येणार आहे दोन दिवसात. सगळ्या भावना आवरून मनाच्या  कुठेल्यातरी खोल कपारीत पुरून टाकायच्या आणि कामाला लागायचे.


Dr Deepak Ranade.

जास्वंदीचे रोपटे

 जास्वंदीचे रोपटे


       माझ्या बाल्कनीला बाहेरून एक कप्पा आहे. ह्या जागी मागच्या वर्षी शिफ्ट झालो,तेव्हा तो कप्पा आवर्जून साफ करून घेतला. तिथे माझ्या आवडीची काही फुलझाडे,आणि तुळस इत्यादी ठेवायचे ठरविले. दोन वेगवेगळ्या रंगाची जास्वंदाची, एक तुळस,एक गुलाब,आणि एक रानजाईची रोपटी कुंड्यांमध्ये लावून त्या कप्प्यावर मांडून ठेवली. रोज सकाळी,बाल्कनीत चहा पिण्याचा आवडता प्रोग्रॅम. समोरच एक छोटेसे जंगल आहे. तिथे,बाभूळीचे वृक्ष आणि इतर झाडे अगदी हाकेच्या अंतरावर. ह्या बोभुळीच्या झाडावर सकाळी अनेक पक्षांचा चिचिवाट. आणि जवळ जवळ रोजच,भारद्वाजाचे दर्शन. ही बाल्कनी म्हणजे ह्या घराचा आणि कालांतराने माझा सुद्धा आत्मा. बाल्कनीत बसून तासन्तास वेळ कसा जायचा,कळतच नसे.

   ती जास्वंदाची दोन्ही रोपटी माझी लाडकी. एकाला विकत घेताना तांबडी चुटुक फुले होती,आणि दुसऱ्याला गुलाबी रंगाच्या फुलांचे वरदान. अगदी मनोभावे त्या सर्व रोपट्यांना नित्यनियमाने सकाळी पाणी देण्याचे काम. मगच गरम चहाच्या घोटाचा मजा. काही महिन्यांत त्या रोपट्यांशी एक भावनिक नाते निर्माण झाले. नवी कळी अली,की खूप आनंद वाटे. ते रोपटे मला जणू माझ्या पाणी घालण्याचे, प्रेमाने पानांवरून हात फिरवण्याचा मोबदला देऊ पहात होते. ते उमललेले टवटवीत फूल काय लोभसवाणे आणि सुंदर दिसे. त्या प्रत्येक पाकळीची रचना,तो रंग,सारे त्या परतत्वाची अभिव्यक्तीच जणू. आयुष्य नव्याने सुरू केले होते,आणि मनात एक नवी उर्मी जागी करण्याचे सतकृत्य ते रोपटे अगदी सहजपणे नकळत करीत होते. असेच काही महिने कधी उलटले,कळलेच नाही. आयुष्य पुन्हा रुळावर येत होते. पवना काठी स्वतःच्या घराचे काम देखील जोरात चालू होते.

आणि एके दिवशी, त्या लाल चुटुक फुले असलेल्या जास्वंदच्या रोपट्याची पाने झडू लागली. जवळून निरीक्षण केले,तर धक्काच बसला. त्या पानांच्या आणि देठाच्या बऱ्याच भागावर अळ्यांचा मुक्त संचार चालू होता. 

खूप दुःखी झालो ते बघून. माझे लाडके रोप. आपल्या जवळचा कोणी नातेवाईक आजारी पडलतासारखे वाटत होते. ती सारी पाने त्या अळ्यांमुळे विकृत आणि वेडी वाकडी झाली होती. मी अत्यन्त दुःखी मनाने कात्री घेऊन आलो आणि ती सर्व पाने देठापासून कापून टाकली. अगदी खालची 3 ते 4 पाने सोडून शेवटी फक्त 2 फूट उंच रोपट्याची काडी  शिल्लक राहिली होता. ती  कापलेली पाने, केविलवाणी कुंडीत पडली होती. 

नुकतेच आयुष्यात घडलेले काही प्रसंग आठवले. नात्यांचे सुद्धा असेच असावे. अपेक्षांची, स्वार्थाची, अहंकाराची कीड लागली की मग स्वाभिमानाच्या कात्रीने ती नाती कापून टाकावी लागतात. मग आयुष्य त्या  पाने नसलेल्या काडी सारखे निष्पर्ण होते.  पण अशा वेळी डोके शांत ठेवून त्याच निष्पर्ण रोपट्याला रोज पाणी घालत राहिलो. आयुष्याच्या रोपट्यावर नात्यांची पाने असावी,आणि काही अगदीच अर्थपूर्ण नाती फुलांसारखी उमलावीत,अशी काहीशी कल्पना मनात असे.आयुष्याच्या निष्पर्ण काडीला प्रेम,सहृदयता चे पाणी,निरपेक्षतेचे कीटकनाशक फवारत होतो. स्वाभिमानाचे खत,घालणे सुद्धा खूप उपयोगी ठरते. आणि मग, एके दिवशी त्या निष्पर्ण काडीला पोपटी रंगाची नाजूक, इवलीशी पालवी फुटले.

खूप आनंद झाला ते पाहून. आणि मग अक्षरशः पुढच्या काही दिवसात ती पालवी प्रत्येक कापलेल्या डेखा पाशी उगवली. 

आज, पाणी घालताना त्याच काडीवर मोजून 13 कळ्या उमलल्या होत्या. 

ती काडी चैतन्याने लडली होती.ह्या प्राणशक्तीची काय कमाल असते. प्राणशक्ती,चैतन्य,काही म्हणा,पण ती नवी पालवी म्हणजे एक साक्षात्कारच. चराचरात ओसंडून भरलेले असतेच ते चैतन्य,ते परतत्व, ते परब्रह्म. 

त्या काडीला त्या कापलेल्या पानांची आठवण येत असेल का? कदाचित,जिथे ते पान कापले होते,त्याच वणातुन नवे पान उगवले होते. मनात नवी पालवी उमलायला, प्रथम मन निष्पर्ण करणे गरजेचे. निष्पर्ण मन. त्या निष्पर्ण मनात अनंत पाने उमलवण्याची क्षमता असते. 

The Last Leaf, ह्या O Henry  ची गोष्ट आठवली. निसर्ग,आणि आयुष्य यात किती साम्य असते आणि  दोन्ही खूप काही शिकवून जातात.


Dr Deepak Ranade.