Sunday, November 7, 2021

दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समायी काहे को दुनिया बनायी,

 व्यवधान


भोमे काकांबरोबर गप्पा मारताना त्या गप्पा अध्यात्माकडे अगदी नकळत वळण घ्यायच्या. अशाच एका दिवशी सकाळी हॉस्पिटलला जाण्यापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असे वाटले आणि मग गाडी 10 मिनीटात त्यांच्या दारात.

त्या देवतुल्य गृहस्तांच्या पाया पडलो आणि त्यांच्या जवळ बैठक मांडळी. त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मोघम चौकश्या करून झाल्यावर मी त्यांना माझ्या मनात बरेच दिवस घुटमळत असलेला प्रश्न विचारला. 

तो परमात्मा जर स्वयंसिद्ध असला,तर मग त्याने हे ब्रह्माण्ड कशा साठी निर्मिले? 


"दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समायी

काहे को दुनिया बनायी,

तुने काहे को दुनिया बनायी "


 खरच हा एवढा पसारा इतकी जीववैविधता इतकी अफाट सूर्यमाला, galaxies, stars वगरे कशासाठी?

मानव,त्याची नाती, सुखदुःख,आजार,जन्म मृत्यू, सर्वच अनाकलनीय. 

असा थोडा क्लिष्ट प्रश्न विचारला,की

भोमे काकांची एक विशिष्ट reaction  असायची. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलायचे आणि मग दोन मिनिटे शांतता. मग ते डोळे मिटून 3 ते 4 खोल श्वास घेत. आणि मग डोळे उघडून माझ्याकडे intensely बघायचे. 

मग काही सेकंदानंतर बोलायला लागायचे. 

    अरे, हे सारे ब्रह्माण्ड म्हणजे त्या ब्रह्माची स्वतःला असण्याची जाणीव होण्यासाठी केलेला कल्पना विलास. 

त्या परमात्म्याला आपण असल्याची देखील जाणीव नसते. नेणिवेची ती निर्गुण निराकार अवस्था. मग, आपण आहोत याची जाणीव होण्यासाठी त्या तत्वाला व्यक्त होण्यासाठी सगुण साकार स्वरूपात व्यक्त व्हावे लागले. 

"A holomovement in its awareness, to become aware of its own beingness."

हे वाक्य मी " I AM THAT " या पुस्तकात वाचले होते. त्या वाक्याची आठवण झाली. 

     म्हणजे त्या ब्रह्माला सुद्धा आपण आहोत, याची जाणीव होण्यासाठी अद्वैतातून द्वैताकडे प्रवास करावा लागला. 

The observer and the observed cannot exist separately. They are essentially one, as is the act of observation.

म्हणजे,मीच मला बघतोय. 

पण परमात्म्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी दुसऱ्याची निर्मिती करावी लागली. 

मग मला सुद्धा माझ्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी कोणाची तरी गरज लागणारच.माझ्या अस्तित्वाची जाणीव आणि अस्तित्वाचा अर्थ द्वैतातूनच समजणे आले. माझ्या आयुष्यला अर्थ हा इतर व्यक्तींकडूनच प्राप्त होत आहे. माझ्या आयुष्ट्याचा अर्थ व्यक्ती सापेक्ष आहे. मग मैत्री,नाती,नातेवाईक,प्रेयसी,प्रियकर,हे सारे त्या मूलभूत अर्थ शोधण्याची साधनेच आहेत. केंद्र स्थानी असतो मी,आणि माझ्या असण्याला अर्थपुर्ण करण्यासाठी केलेली धडपड म्हणजेच का आयुष्याचा अर्थ? 

काहींना त्यांच्या असण्याची जाणीव होण्यासाठी कुठली तरी activity, कौशल्य,कला,करून अर्थ शोधतात. 

पण मी आहे,याची प्रचिती काहीतरी करून,किंवा कोणाबरोबर तरी राहूनच येते. त्यालाच व्यवधान म्हणावे लागेल. मग व्यक्ती,नाती,ही प्रसंगानुरूप बदलतात इतकेच. प्रत्येकाला वाटते,की ही अमुकामुक व्यक्ती खरच माझ्यावर निरपेक्ष प्रेम करते. 

पण आपल्या आयुष्यात कोणीतरी व्यक्ती असणे,हीच मूलभूत अपेक्षा असते. त्या व्यक्तीकडून काही अपेक्षा नसेल,पण व्यक्तीची अपेक्षा असतेच. आपल्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी. 

जिथे,  ब्रह्माला सुद्धा व्यक्तीची गरज झाली आणि मग स्वतःच नानाविध प्रकारांनी व्यक्त झाला, तिथे म्या पामराची काय अवस्था? 

      माझ्या प्रश्नाचे म्हणावे तसे उत्तर काही मिळाले नाही मला. भोमे काकांच्या पायी पडलो आणी निरोप घेऊन हॉस्पिटलकडे कूच केली. नाही उमगणार या प्रश्नाचे उत्तर. 

दुनिया बनानेवाले, क्या तेरे मन मे समायी

काहेको दुनिया बनायी ????


Dr. Deepak Ranade.

No comments: